मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-विरारः प्रतिनिधी
मुंबईसह उपनगरांतील कल्याण, डोंबिवली, विरार, वसई आणि नवी मुंबई परिसरात पावसाची जोरात बॅटिंग सुरु आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरांमधल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडून मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होवू लागल्याने उपगनरात राहणाऱ्या अनेक चाकरमान्यांना अक्षरक्ष घरात कोंडल्याची परिस्थिती पाह्यला मिळाली. तसेच मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. तर ज्या सुरु होत्या त्या उशीराने आणि धिम्या मार्गाने सुरु असल्याची माहिती मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेस्थानकावर देण्यात येत होती.
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने बॅकलॉग भरुन काढत असल्याची चर्चा उनगरवासियांमध्ये सुरु झाली आहे. रात्रीपासूनच्या सततच्या पावसामुळे उपनगरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले. कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर, भांडूप रेल्वे स्थानकाजवळील पोलिस ठाणे जवळ गुडघ्यापर्यंत पाणी साचले. डोंबिवलीतही सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. याशिवाय अनेक नागरीकांच्या घरात पाणी घुसल्याने पावसातच नागरीकांना निवारा शोधावा लागत होता.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळतो आहे. पावसाचा परिणाम मुंबईतल्या लोकलसेवेववरही झाला आहे. मुंबईतल्या हार्बर, सेंट्रल आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरची वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. दादर, माटुंगा, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली या ठिकाणीही जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह कोकणातही पावसाची जोरदार हजेरी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान खात्याने किनारपट्टी भागात हाय अलर्ट जारी केला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश स्थिती आहे. पुणे, पिंपरी आणि नाशिकमध्येही चांगला पाऊस होतो आहे. पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तर नागरिकही चांगलेच सुखावले आहेत. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने मुंबईकरांची, पुणेकरांची पाण्याची चिंताही मिटल्यात जमा आहे.
दरम्यान पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारीच वर्तवला होता. आता पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह किनारपट्टी भागात शनिवार आणि रविवारी काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून शुक्रवारीच व्यक्त करण्यात आला होता. त्याच अंदाजाप्रमाणे हा पाऊस कोसळतो आहे.
Marathi e-Batmya