राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश,… जे हजर झाले नाहीत त्यांना नोटीस बजावा सुधारित वाळू / रेती धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी

राज्यात सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सुधारित वाळू धोरणासंदर्भात सद्य:स्थितीचा विभागनिहाय आढावा आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला.

यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहसचिव रमेश चव्हाण, माधव वीर, उपसचिव अजित देशमुख यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, सुधारित वाळू/रेती धोरणामुळे लोकांना स्वस्तात वाळू मिळाली पाहिजे असा या धोरणाचा उद्देश आहे. या धोरणामुळे महसूल स्वरूपात स्वामित्व धन (रॉयल्टी) वर्षाला मिळत होती ती आज महिन्याला मिळत आहे. सामान्य लोकांना या धोरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील डेपोंची तपासणी करून पुढील पंधरा दिवसांत सर्व डेपो चालू झाले पाहिजेत, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. रेती घाट चालू होण्यासाठी पर्यावरण विभागाच्या अनुमती अभावी काही घाट प्रलंबित आहेत. त्याबाबत तातडीने कार्यवाही करून रेती घाट सुरु करण्यात यावे, असेही ते म्हणाले.

काही ठिकाणी जलसंपदा विभागाचे सहकार्य आवश्यक आहे, याबाबत संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून अडचणी दूर कराव्यात. अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने हजर व्हावे

महसूल मंत्री पाटील म्हणाले, वाळू धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांपैकी ३३ अधिकारी अजूनही रुजू झालेले नाहीत. याबाबत विभागीय आयुक्त यांनी संबंधित अधिकारी यांना तातडीने हजर होण्याबाबत नोटीस जारी करावी. सर्व अधिकाऱ्यांनी त्वरित हजर व्हावे, अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. राज्यात पदभरतीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे, याबाबत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे आवाहन, पराभवाने खचून जाऊ नका, मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांबरोबर वर्षा गायकवाड यांची राजीव गांधी भवनमध्ये बैठक

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व दबावाला बळी न पडता लढा दिला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *