धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली धारावीकरांना विस्थापित करून अदानीचे टॉवर उभे करण्याचा भाजपा-शिंदे सरकारचा प्रयत्न आहे. धारावीकरांचा तीव्र विरोध असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत भाजपा सरकारने अपात्र लोकांना भाडेतत्वावरील घरे देण्याचा जीआर काढला असून दोन धारावी करण्याचा सरकारचा इरादा असून एक अदानीसाठी व दुसरी गरीबांसाठी, असा घणाघाती हल्ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, धारावीच्या लोकांनी धारावी उभी केली, त्यांनाच हाकूलन पंतप्रधान मोदींच्या लाडक्या मित्राला फायदा व्हावा अशा पद्धतीने सर्व नियम बनवले आहेत. धारावीच्या भूमीत पंतप्रधानांच्या लाडक्या मित्राचे टोलेजंग टॉवर उभे रहावेत व कोपऱ्यात कोठेतरी धारावीकरांना घरे द्यायचा भाजपा सरकारचा डाव आहे. तसेच इतर लोकांना मिठागरांच्या जमिनी, डंपिंग ग्राऊंडवर हाकलले जाणार आहे. सर्व फायदा केवळ अदानीला होणार आहे, सर्व काही अदानी हितासाठी सुरु असून नुकसान झाले तर तेही सरकारच अदानीला भरून देणार, हा कुठला न्याय आहे? भाजपा-शिंदे सरकार हे गरीब विरोधी आहे परंतु या सरकारने लक्षात ठेवावे की, धारावी ही धारावीकरांची आहे, हे लोक कोठेही जाणार नाहीत, सरकार आमची घरे हिसकावून घेऊ शकत नाही, असा इशाराही यावेळी दिला.
वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, धारावीतील अपात्र झोपटपट्टी धारकांसाठी भाडेतत्वावरील घरे देण्याच्या योजनेसंदर्भात भाजपा शिंदे सरकारने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन आदेश जारी केला आहे. हा शासन आदेश सरळसरळ सरकार अदानीचे एजंट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. “धारावीतील अपात्र झोपडीधारकांना तसेच शासन निर्णय ०७/०९/२०१८ नुसार सशुल्क पुनर्वसन करताना सशुल्क सदनीकेची किंमत अदा करण्याची क्षमता नसलेल्या झोपडीधारकांना सामावून घेण्याकरता भाड्याने घरे देण्याची योजना राबवण्याबाबतच्या धोरणास” मान्यता देण्यात येत असल्याचा शासन आदेश जारी केल्याचे सांगितले.
शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा शिंदे सरकारच्या शेवटच्या घटका भरल्या आहेत, मोदी-शाह यांच्या आदेशानुसार हे सरकार अदानीच्या फायद्यासाठी निर्णय घेत आहे पण दोन महिन्यांनी महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे हे लक्षात ठेवावे, असा सूचक इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya