मुंबई, ठाणेनंतर औरंगाबादेतील सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठविल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भोंग्यावरून अल्टीमेटम दिला. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्या सभेतील भाषणावरून खोचक टीका केली. ते म्हणाले की, सियासत की दुकानों मे रोशनी के लिए, जरुरी है मुल्क मेरा जलता रहें”, ( राजकीय दुकानदारीतल्या प्रकाशासाठी देश माझा जळत राहो.) हाच हेतू राज ठाकरेंच्या भाषणाचा होता, अशी टीका केली.
राज ठाकरेंनी अल्टिमेटम मुस्लिम समाजाला नाही, तर राज्य सरकारला दिलाय. त्यामुळे हा संपूर्ण मुद्दा राज्य सरकार कसा हाताळते हे पाहणं महत्वाचे आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते आहे, त्यामुळे ते ही परिस्थिती कशी हाताळते, काय निर्णय घेतात हे पाहू. पण ३ मे ची तारीख एका दिवसांनी वाढवली आहे. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ ते अयोध्येला निघून जातील आणि नंतर कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावावी, काही झाल्यास कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून घ्यावेत, राज मात्र अयोध्येला जातील. बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याऐवजी त्यांना भरकटवण्याचं काम राज ठाकरे करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
तुम्ही भाजपाच्या इशाऱ्यावर हे सगळं करत आहात, मग त्यांची देखील यापूर्वी पाच वर्ष राज्यात सत्ता होती. त्यांनी त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन का केलं नाही? राज्यात सगळं सुरळीत चाललंय, कोरोनातून वाचलो आहोत, वर्षापूर्वी आपण औषधांसाठी भांडत होतो आणि आता आपण रोजगार, महागाई, आरोग्य सुविधा हे सर्व सोडून भोंग्यांवर बोलत आहात. इतिहास आता पुन्हा उकरून काढण्यात काही अर्थ नाही असेही ते म्हणाले. माझ्या सभेला गर्दी होते म्हणून मी निर्णय घेणार, असं नसतं. आणि जर असं असेल तर त्याच मैदानात दुपटीने लोक बोलवून मला सभा घेण्याची परवानगी द्या, त्याच्यापेक्षा मोठं मैदान असेल तर त्याची परवानगी द्या. हा देश संविधानावर चालतो, इथे हुकूमशाही चालत नाही. आम्ही एवढं बोललो असतो, तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. जीभ मलाही आहे, मी ही बोलू शकतो, नियम सगळ्यांसाठी आहे. ज्या भाषेचा वापर तुम्ही करताय, त्यापेक्षा चांगली भाषा मी बोलू शकतो असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मात्र, आपण तसं करणार नसून राज्यात सर्वांनाच राहायचं आहे, असेही शेवटी ते म्हणाले.
Marathi e-Batmya