“हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे चिरंजीव निवडणुकीच्या मैदानात उतरले असतील, तर आपणही नाते जपायला हवे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील, तर महायुती म्हणून त्यांना समर्थन द्यायला हवे, असे मला वाटते. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे”, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी शनिवार बोलताना दिली.
वांद्रे येथे माध्यमांशी संवाद साधताना आ. आशिष शेलार बोलत होते. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले, भले उद्धव ठाकरेंना वाटत नसेल, तरी महायुतीने नाते जपायला हवे, असे मला वाटते. सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. पण, महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल, असेही यावेळी सांगितले.
नाना पटोलेंच्या आरक्षणविरोधी भूमिकेवर टीका करताना आशिष शेलार म्हणाले, परदेशात राहुल गांधी यांनी अकलेचे दिवाळे दाखवून दिले. त्याला नाना पटोले यांनी समर्थन करून आरक्षणाचा अपमान केला आहे. त्यामुळे पटोले यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी करत चैतन्यभूमीवर भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर जाऊन नाक घासावे. दुसरे म्हणजे, ज्या जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला, त्या आव्हाडांनी आरक्षणाच्या विषयावर तर बोलूच नये, अशी टीकाही यावेळी केली.
नवाब मलिकांना भाजपाचा विरोधच!
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, नवाब मलिकांना आमचा विरोध आहे. त्यांना तिकिट द्यावे, की नाही, याचा निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते घेतील. परंतु, दाऊदशी संबंधित असलेल्या नवाब मलिक यांचे काम भाजपाचे कार्यकर्ते करणार नाहीत. आमची भूमिक ठाम असल्याचे स्पष्ट केले.
Marathi e-Batmya