भारतीय जनता पार्टी-भाजपाची राष्ट्रीयत्वाची विचारधारा सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्थापना दिनाच्या निमिताने राज्यभर मंडल स्तरापर्यंत कार्यक्रम होणार आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. भाजपा स्थापना दिनानिमित्त प्रदेश कार्यलयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमावेळी रविंद्र चव्हाण बोलत होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. अभिमन्यू पवार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शलाका साळवी, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, ज्येष्ठ नेते अतुल शाह, गणेश हाके, शैला पतंगे – सामंत, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष व नगरसेवक तेजिंदर तिवाना, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, सह प्रभारी विश्वास पाठक, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, सह सचिव भरत राऊत, सदाशिव चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, पक्षाचा स्थापना दिन साजरा करण्याच्या निमित्ताने पक्षाचे कार्यकर्ते आपली विचारधारा सामान्य माणसापर्यंत पोहोचवणार आहेत. स्थापना दिनाच्या निमित्ताने आगामी सात दिवसांच्या काळात मंडल स्तरापर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. पक्षाच्या वाढीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी केलेल्या त्याग, समर्पणाचे स्मरण या दिवशी केले जाते. अशा विचारधारेच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतः ला भाग्यवान समजतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.
प्रदेश उपाध्यक्ष व स्थापना दिन कार्यक्रमाचे संयोजक केशव उपाध्ये यांनी सांगितले की, पक्षाच्या स्थापने वेळी अटलजींनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात आले आहे. स्थापना दिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. भाजपाच्या स्थापना दिनानिमिताने प्रखर राष्ट्रवादाच्या विचारधारेचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
Marathi e-Batmya