राज्यातील संशयातीत बहुमत मिळविलेल्या महायुतीकडून निकाल जाहिर झाल्यानंतर १० दिवस झाले तरी राज्यातील सत्ता स्थापनेबाबत अद्याप दावा केला नाही. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे जाहिर केले. मात्र प्रत्यक्षात अद्यापही भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु आहे. तसेच एकमेकांच्या विरोधात दबाव तंत्रांचा वापर करण्यात येत आहे. मात्र आपापल्या पक्षाच्या पदारात महत्वाची खाती कशी मिळतील यासाठी महायुतीतील घटक पक्षांकडून प्रयत्न सुरु केले आहे.
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेते पदासाठी अद्याप बैठक झालेली नाही. तसेच ही बैठक शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी विधानभवनात होत आहे. तसेच त्याच बैठकीला दिल्लीतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी निरिक्षक म्हणून हे दोघे जण मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहे. या दोन निरिक्षकांच्या उपस्थितीतच नेता निवड आणि मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याचबरोबर भाजपाचे काही नेते शपथविधीसाठी ठरविण्यात आलेल्या आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर, प्रविण दरेकर, गिरिष महाजन यांच्यासह अन्य काही नेते गेले होते. त्यामुळे शपथविधीचा कार्यक्रम सुनिश्चित ठरल्यावेळेनुसार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी कोणाकोणाला आमंत्रित करायचे आणि कोणाला नाही याचे नियोजन करण्याचे कामही युद्ध पातळीवर भाजपाकडून सुरु आहे.
आझाद मैदानाची पाहणी केल्यानंतर भाजपाचे सर्व आमदार आणि नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले.
तर सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज डॉक्टरांनी पुन्हा एकदा आराम करण्यास सांगितल्याने शिंदे गटाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली आमदारांची बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे हे सातत्याने तब्येतीत फऱक पडवा यासाठी आराम करत असून पक्षाचे आलेल्या एकटे-दुकटे आमदारांना भेटत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले असून दिल्लीत ते अमित शाह यांना भेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान काही वेळानंतर अजित पवार हे त्यांच्या कौटुंबिक दौऱ्यासाठी दिल्लीला गेल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता अजित पवार यांचे सारे कुटुंबिय बारामती, कल्याण आणि पुणे जिल्ह्यातच रहात असल्याने अजित पवार हे नेमके कोणत्या कुटुंबियांच्या भेटीसाठी चालले आहेत अशी चर्चा यावेळी सुरु झाली आहे.
Marathi e-Batmya