राज्यातील विधानसभा निवडणूकीत संशयातीत पाशवी बहुमत महायुतीला मिळाले. विधानसभेचा निकाल जाहिर होऊन आज जवळपास चार दिवस झाले. परंतु भाजपा आणि महायुतीकडून अद्याप मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले नाही. तर अनेक राजकिय जाणकारांच्या मते मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र वास्तविक पाहता भाजपाकडून एका महिला आमदाराच्या नावाची चर्चा सध्या गंभीरपणे सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला एकनाथ शिंदे यांना राजकिय शह देण्यासाठी डोंबिवलीतील आमदाराला मुख्यमंत्री पदी संधी देण्यात येणार असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरु झाल्याचे भाजपामधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकीत भाजपा आणि महायुतीला मोठा झटका बसल्यानंतर विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने मध्य प्रदेशातील लाडली बहणा योजनेच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केली. या योजनेचा लाभ जवळपास १.५० लाख ते २ लाख महिलांना मिळाला. त्यामुळे राज्यातील महिलांनी महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पारड्यात मतांचे दान टाकले असल्याची चर्चा अद्यापही राज्याच्या जनतेत आणि राजकिय वर्तुळात आहे.
त्यातच महाविकास आघाडीचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान राज्यात महिला मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत दिले. तसेच राज्याच्या पुरोगामी चेहऱ्यानुसार ६४ वर्षाच्या इतिहासात महिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाली नसल्याने राज्यात महिला मुख्यमंत्री करण्याचे विधानही केले होते. परंतु लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून १५०० रूपयांचा लाभ घेणाऱ्या राज्यातील बहिणींनी शरद पवार यांच्या संकेताला फारसे महत्व दिले नाही.
अखेर संशयातीत पाशवी बहुमत मिळविणाऱ्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या वर्तुळात शरद पवार यांच्या घोषणेप्रमाणे राज्यात महिला मुख्यमंत्री बनविण्याच्या रणनीतीवर गंभीरपणे चर्चा सुरु आहे. जर महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाली तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच अजित पवार यांचा राजकिय काटाही आपोआप निघणार असून या महिला आमदाराच्या माध्यमातून महायुतीतील शिंदे-पवार यांच्या गटाचा गेम करण्याची रणनीतीही भाजपाकडून आखण्यात येत आहे.
दरम्यान, भाजपाकडून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या आणि संघाच्या धोरणाशी एकनिष्ठ असलेल्या घरातील महिला आमदाराची निवड मुख्यमंत्री पदासाठी करण्याचा विचार असल्याचेही यावेळी भाजपामधील वरिष्ठ नेत्यांकडून बोलले जात आहे.
Marathi e-Batmya