अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला सुरूवात झाली. दावे प्रतिदावे केले जात असतानाच अजित पवार गटाचे जेष्ठ नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आता भाजपाला विचारल्या शिवाय निर्णय घेता येणार नसल्याचे वक्तव्य नाशिक येथे बोलताना केले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, दोन्ही ठाकरे बंधू जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे असं वाटत आहे. परंतु अशा काही चर्चा झाल्या का याबाबत माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की माझ्याशी कधीही अजित पवार त्याबाबत कधीही बोलले नाहीत. परंतु जे काही करायचे ते आम्हाला भाजपा सोबत राहून करायचे आहे. असे करायचे असले तर त्याबाबत आम्हाला भाजपाला विचारावे लागेल. कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही घ्यायचे याबाबत भाजपाच्या काही ज्येष्ठ मंडळींना विचारावं लागेल. कारण काय बोलणं झालं होतं हे माझ्यासह कोणालाही माहीत नाही असेही सांगितले.
जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी येत्या १२ तारखेला दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार होते अशी माहिती दिली. या विलिनीकरणा बाबत अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे. मात्र आधी नगरपंचायत त्यानंतर महानगर पालिका आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे हे विलिनीकरण होऊ शकले नव्हते. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत केलेले विधान महत्वाचे आहे.
नाशिक येवला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करताना म्हणाले की, ज्यांच्या सोबत आपण सरकारमध्ये आहोत त्यांना तर विचारावे लागेल ना. जर सरकार मधून बाहेर पडायचे असा विचार दादांनी केला असेल असे कदापिही आम्हाला वाटत नाही. आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली. आता त्यांच्या नेतृत्वात चर्चा होतील ना, आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असे काही नाही. राजकारणाच्या गोष्टी कधी होतात कधी नाही होत असेही यावेळी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची शपथ घेत एकत्रिकरणाची चर्चा झाली होती अशी माहिती दिली. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, बोलणं झालं असेल, परंतु आता परिस्थिती बदलली, नेते बदलले आहेत. सुनेत्रा पवार यांना माहिती होती का ? आता त्यांच्या नेतृत्वाखालील बाकी नेते देखील चर्चा करतील. शेवटी हा निर्णय सामुदायिक रीतीने घ्यावा लागेल. त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागे भाजपाला सुद्धा उभे राहणे आवश्यक आहे. विलिनीकरणाचा निर्णय भाजपाला विचारूनच घेतला जाईल असेही सांगितले.
Marathi e-Batmya