मराठी ई-बातम्या टीम
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झालेले असताना राज्य सरकारचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांच्या आजारपणामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहता आले नाही. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार दुसऱ्या सोपविण्याची मागणी केली. विरोधकांच्या या आरोपाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतित्युर देत तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपवाद वगळता कधी संसदेच्या अधिवेशनात कधीच नसतात मग त्यांचा चार्जही दुसऱ्या मंत्र्याकडे द्यावा असा उपरोधिक टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली आहे. ते अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहणार आहेत. आमची त्यांच्याशी चर्चा झाली आहे. परंतु विरोधक मात्र विनाकारण त्यावरून राजकारण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा लोकसभा व राज्यसभेत उपस्थित नसतात त्याची माहिती भाजपाने आधी घ्यावी व नंतर बोलावे असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून प्रश्न विचारत त्यांचा चार्ज दुसऱ्यांकडे द्यावा अशी विचारणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आधी संसदेची माहिती घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी अपवाद वगळता अधिवेशनात कधीच उपस्थित नसतात त्यांचा चार्जही दुसऱ्या मंत्र्याकडे द्या, अशी उपरोधिक मागणीही त्यांनी यावेळी केली.
राज्यातील नोकर भरतीच्या प्रश्नावर सभागृहात बोलताना नाना पटोले म्हणाले की, पेपरफुटीच्या घटनांवर सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. कारण हे घोटाळे कुठून सुरु झाले आणि याचे तार कुठपर्यंत जोडले गेले आहेत याची माहिती राज्याच्या जनतेपर्यंत गेलीच पाहिजे. तरुणांची जी गैरसोय झाली त्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही. शासनामार्फत काय कारवाई केली जात आहे हे जनतेला कळले पाहिजे. या प्रकरणाचे तार कुठपर्यंत आहेत त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत.
Marathi e-Batmya