ऐरवी फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरून आक्रमकपणे टीका करणारे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी तसे इतरवेळी शांत असल्याचे अनेकवेळा राज्यात दिसून आले. मात्र आज सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री केसरकर हे पुन्हा एकदा संतापलेले दिसले आणि संतापाच्या भरातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर होणार नाही असे सांगत पाहुण्यांचा आदर ठेवायला शिका असेही शिक्षण संस्था चालकांना सुनावले.
शिक्षण संस्था चालकांच्या अधिवेशनात काही संस्था चालकांनी पवित्र पोर्टल रद्द करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे आदी उपस्थित होते. यानंतर दीपक केसरकरांनी तुम्ही मला पाहुणा म्हणून बोलावलं आहे, तर पाहुण्याचा आदर ठेवायला शिका, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते रविवारी २ ऑक्टोबर रोजी सांगलीत बोलत होते.
सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ अधिवेशनात संस्था चालकांनी आक्रमक होत पवित्र पोर्टल रद्द करण्याची मागणी. यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित संस्था चालकांना धारेवर धरले. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच दीपक केसरकरांनी संस्था चालकांवर ताशेरे ओढले. पवित्र पोर्टल भरतीवरून शिक्षण संस्था चालकांनी, शिक्षणमंत्र्यांचे भाषण सुरू असताना पवित्र पोर्टल रद्द करा, अशा घोषणा दिल्या.
यानंतर संतप्त दीपक केसरकरांनी संस्थाचालकांची भाषणामध्येच खरडपट्टी केली. केसरकर यांनी सुप्रिया सुळे यांनी विषय मांडला म्हणून मी बोलतोय, असं सांगितले. तसेच पवित्र पोर्टल रद्द करायला मी येथे आलो नाही, असेही त्यांनी नमूद केले.
तुम्ही पाहुणा म्हणून बोलावले आणि मी पाहूणा म्हणून आलो आहे. त्यामुळे पाहुण्यांचा आदर ठेवायला आधी शिकले पाहिजे, अशा शब्दात मंत्री केसरकरांनी शिक्षणसंस्था चालकांना सुप्रिया सुळेंसमोर खडेबोल सुनावले.
पोर्टलमध्ये त्रुटी असतील तर सांगा, पण पोर्टल रद्द करा म्हणून कार्यक्रमात तुम्ही बोलणार असाल, तर पोर्टल अजिबात रद्द केले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी जाहिर केले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालेल्या धमकीवर दीपक केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सुरक्षा सोडून गर्दीत जाऊ नका असं नेहमी सांगतो. कारण असं ज्या ज्या लोकांनी केलं आहे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या कारणामुळे आपण दोन पंतप्रधानांना गमावले आहे.
Marathi e-Batmya