राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदी आणि शहा यांच्यासोबतची ही त्यांची पहिली भेट आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे समजते.
सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारीला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर काल, मंगळवारी त्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज नवी दिल्लीत जाऊन सुरुवातीला अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिवंगत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार उपस्थित होते.
महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar जी यांची भेट झाली.
आपले सर्वांचे लाडके स्व. अजित पवार जी यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे सहज शक्य नाही. परंतु, जनकल्याण आणि राज्याच्या विकासाचे त्यांचे स्वप्न साकार करणे हे आपल्या… pic.twitter.com/H1JeFhFv0J
— Amit Shah (@AmitShah) February 11, 2026
दरम्यान, या भेटीनंतर अमित शाह यांनी एक्स या समाज माध्यमात ट्विट केले आहे. आपल्या सर्वांचे प्रिय स्वर्गीय अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढणे सोपे नाही. परंतु त्यांच्या लोकल्याण आणि विकासाच्या दृष्टीला साकार करणे हे आपल्या सर्वांचे कर्त्यव्य आहे, असे शहा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Marathi e-Batmya