विरोधकांकडून गेली अडीच वर्षे आमच्यावर सातत्याने खालच्या भाषेत टीका करण्याचे काम केले. या विधानसभा निवडणूकीत राज्यातील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. त्यामुळे त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध करत बसू नये. आता विरोधकांनी जुनं रडगाणं बंद करुन विकासाचं नवं गाणं गावं असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या सारख्या सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रा सारख्या राज्याचा अडीच वर्षे मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. आमच्या महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात आता पर्यंतच्या इतिहासात कधीही न राबवलेल्या योजना यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न केला. हा कार्यकाळ राज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. आमच्या वेगवान सरकारची अडीच वर्षाची कारकिर्द यशस्वी ठरली आहे, अशी भावनाही यावेळी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नरिमन पॉईंट येथील शिवसेना पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना एकनात शिंदे म्हणाले, मी पदा पेक्षा नेहमीच कामाला महत्व दिले. गेली अडीच वर्षे मी कार्यकर्ता म्हणून काम केले आणि यापुढेही कार्यकर्ताच म्हणून काम करत राहीन. आगामी महायुती सरकारच्या काळात विकास हाच आमचा अजेंडा राहणार आहे. आम्ही कायमच बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे काम केले. या कामामुळेच आम्ही ४० आमदारांवरुन ५७ आकडा गाठला आहे, आमच्या कामाची लोकांनी दिलेली ही पोचपावती आहे. तसेच खरी बाळासाहेबांची शिवसेना कोणाची याचा निकालही जनतेने दिला असल्याचे यावेळी सांगितले.
मुख्यमंत्रीपदावरुन असलेल्या नाराजीवर विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदासाठी कधीही नाराज नव्हतो. माझी तब्यते बरी नसल्याने काही दिवस दरे गावी मुक्कामी होतो. मुख्यमंत्रीपदाबाबत माझी २७ नोव्हेंबरलाच भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे माझ्या नाराजी बातम्यात कोणतेही तथ्य नव्हते.
लाडकी बहिणी योजनेबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारला पुन्हा विजयी केल्याबद्दल लाडक्या बहिणींना विशेष धन्यवाद देतो. लाडकी बहिण योजना ही सुरुच राहणार आहे. या योजनेचा डिंसेबरचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावर जमा करण्याच्या सुचना संबधित विभागाला दिल्या असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya