एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, धंगेकर- मोहोळ हा विषय आता संपला, महायुतीमध्ये मतभेद नको आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारल्या जातील

कार्तिकी एकादशी आणि त्यानिमित्त होणाऱ्या वारीदरम्यान आळंदीत लाखो वारकरी येतात. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्या दर्जेदार असतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.आळंदीतील भक्तनिवास, घाट विकास कामांचे भूमिपूजन आणि रुग्ण तपासणी केंद्राचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, यापूर्वी कलशारोहण आणि महाद्वार उद्घाटनासाठी आलो होतो. प्रत्येक वेळी आळंदीला आल्यावर मन समाधान पावते, प्रसन्न होते आणि घरच्यासारखे वाटते. आळंदीतील घाट आणि भक्तनिवासाचे काम उच्च दर्जाचे होईल आणि वारकऱ्यांना सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील.

इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हा अतिशय गंभीर विषय आहे. सरकारने या संदर्भात कामाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर याबाबतचे प्रेझेंटेशन झाले असून, इंद्रायणी स्वच्छ करणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील असेही यावेळी सांगितले.

सातारा येथील महिला डॉक्टर प्रकरणाविषयी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई होईल. हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात येईल असेही यावेळी सांगितले.

धंगेकर–मोहोळ वादावर विचारले असता शिंदे म्हणाले, धंगेकर हे अन्यायाविरुद्ध काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांची भूमिका कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून वृत्तीविरोधात आहे. मी धंगेकर यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. युतीमध्ये मतभेद नकोत, हा विषय आता संपला आहे. विरोधकांच्या हातात कोलीत देण्याची गरज नसल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईकचे आदेश, अवैध प्रवासी वाहतूक रोखा.. १ मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवणार..

राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *