आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांचा हा काही पहिल्याच प्रकार नाही. हे महाशय वारंवार दादागिरी करतात, महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो, असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आमदार संजय गायकवाड यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन मध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सत्ताधारी आमदारांचा धुमाकूळ सुरू आहे आणि सरकारची पकड राहिलेली नाही. महायुतीच्या आमदारानी अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. संजय गायकवाड यांचे यापूर्वी फोन व्हायरल झाले होते. या माणसाला वाचाळवीर ही पदवी उपमुख्यमंत्री यांनी दिली होती. ते सातत्याने बेताल वक्तव्य करत असतात. राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला १ लाख रुपये बक्षीस देऊ, फडणवीसांच्या तोंडात कोविडचे जंतु घाला, असे हा वाचाळवीर बोलला होता, हा विक्षिप्त व्यक्ती आहे. कँन्टीनवाल्याची काही चुक असेल तर सरकारकडे तक्रार करून त्याचे कंत्राट रद्द करा. विशेष म्हणजे हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकाखाली सुरु आहे. नेहमी रामशास्त्री प्रभुणे सारखा आव आणणाऱ्या फडणवीसांनी जागे व्हावे व कारवाई करावी अशी मागणीही यावेळी केली.
मराठीच्या नावाने गुंडागर्दी करणे चुकीचे..
राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शांततेच्या मार्गाने जात असतील तर राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठीच्या नावाने सुरू असलेली मारहाण, गुंडागर्दी काही पटणारी नाही. मराठी माणसानं संयम बाळागावा, आपली सहिष्णुती, मराठी संस्कृती व महाराष्ट्र धर्म जागवावा.
महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये राबवण्याचा डाव.
राहुल गांधी यांनी आज बिहारमध्ये मोर्चा काढला त्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झालेली आहे आणि ही मतचोरी लपवण्यासाठी सरकार व निवडणुक आयोग नियम बदलत आहेत. महाराष्ट्रातील तोच मतचोरीचा पॅटर्न आता बिहारमध्ये राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे व नंतर तोच पॅटर्न भाजपा सर्व देशात वापरू शकतो. लोकशाहीत निवडणुका ह्या निष्पक्षपाती झाल्या पाहिजेत, पण निवडणुक आयोगच सत्ताधारी भाजपासाठी काम करत असल्याचे चित्र असल्याचा आरोपही यावेळी केला.
पुलवामा ते पहलगाम मोदींनी उत्तरे द्यावीत.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुलवामा स्फोटाला सहा वर्ष झाली पण त्याचा अद्याप तपास झालेला नाही. ४० जवान शहीद झाले, ३०० किलो स्फोटके कुठून आली त्याचा तपास लागलेला नाही. हल्लेखोर सापडले नाहीत. आणि आता पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन निष्पाप २६ पर्यटकांना ठार करून अतिरेकी निवांत परत जातात. ते कूठून आले व कुठे गेले याचा तपास झालेला नाही. चुकीची रेखाचित्रे प्रसिद्ध करून जनतेची दिशाभूल केली. पुलवामा ते पहलगामची सर्व उत्तरे आजही अनुत्तरीतच आहेत असल्याचे सांगितले.
गिरणी कामगारांच्या मोर्चावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लोकांच्या मागण्या ऐकुन घेणे आणि त्याचा सहानुभूतीने विचार करणे गरजेच आहे. पण भाजपा सरकार कोणाशीच चर्चा करायला तयार नाही. त्यांना फक्त बिल्डर व उद्योगपतींशी चर्चा करण्यातच जास्त रस आहे. मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारने यातून बाहेर यावे असे आवाहनही यावेळी केले.
Marathi e-Batmya