राज्यातील परिस्थिती अतिवृष्टी व पुरामुळे अत्यंत विदारक झाली आहे, खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे परंतु प्रशासनाचा एकही अधिकारी पाहणी करण्यासाठी फिरकला नाही. दसरा, दिवाळी सण जवळ आले आहेत, मुख्यमंत्री फक्त आकडेवारी फेकत आहेत, पण ठोस निर्णय काही घेत नाहीत. ओला दुष्काळ आहे हे स्पष्ट दिसत असतानाही सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे. पैसा कुठून आणायचा हा सरकार प्रश्न आहे पण दसऱ्याच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा, कोळीभोडखा, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मसई येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधला व त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी ही उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या समजून घेतल्या आणि या कठीण प्रसंगी काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा धीर दिला.
आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी कडवंची ता. जि. जालना परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी बांधवांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे हृदय पिळवटून टाकणारे चित्र आमच्या पाहणी दौऱ्यात समोर आले.
मा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घटनास्थळी जाऊन… pic.twitter.com/2tyI31Zq8E
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 25, 2025
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री जे बोलतात तशी कृती करत नाहीत, त्यांचे आश्वासन म्हणजे ‘लबाडा घरचे आमंत्रण, जेवल्याशिवाय खरे नाही’, असे आहे. पावसाने शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, संसार उद्ध्वस्त झाले, जगण्याची साधने नष्ट झाली, तरीही निष्क्रीय फडणवीस सरकार केवळ मौन बाळगून बसले आहे. सरकार बांधावर आले आणि फोटो काढून परत गेले पण शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. उलट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांची विधाने तळपायाची आग मस्तकात जावी अशी आहेत. शेतकरी सरकारला प्रश्न विचारत असताना पैसे कुठून आणू, पैसे खिशात घेऊन फिरतो का, राजकारण करू नको, अशा धमक्या देत आहेत. शेतकरी व नागरिक रस्त्यावर आले आहेत, निसर्गाने त्यांचे सर्व काही लुटले आहे अशावेळी जनतेचा आक्रोश जर सरकारला समजत नसेल तर ते असंवेदनशिल सरकार आहे. महायुती सरकारची भाषा अहंकारी व लाजीरवाणी आहे, असेही म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अदानीसाठी सरकारकडे पैसे आहेत. आमदार, खासदार फोडण्यासाठी पैसे आहेत, ५५ हजार कोटी रुपयांच्या समृद्धी महामार्गासाठी पैसा आहे, गरज नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गासाठी पैसा आहे आणि शेतकऱ्यांना द्यायचे म्हटले की पैसा नाही हे रडगाणे काय गाता? असा सवाल करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीला जाऊन केंद्र सरकारकडून महाराष्ट्रसाठी विशेष पॅकेज घेऊन यावे असेही सांगितले.
Marathi e-Batmya