शरद पवार म्हणाले, तेंडूलकरला स्टेडियम बांधायला सांगितले तर…. आशिष शेलार यांना दिलेल्या पाठिंब्यावरून पवारांनी केला खुलासा

नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा आमदार आशिष शेलार यांना पाठिंबा देत त्यांना अध्यक्ष पदी निवडूणही आणले. विशेष म्हणजे या निवडणूकीत माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव झाला. एमसीएच्या निवडणूकीत या युतीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर सूचक शब्दात आरोप केले. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात येत होता. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आशिष शेलार यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत खुलासा केला.

शरद पवारांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “आशिष शेलार हे याआधीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. काही क्षेत्रं अशी असतात, जिथे राजकारण आणायचं नसतं. क्रिकेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही राजकारण आणत नाही”, असं शरद पवार म्हणाले.

खरंतर लोकांना हे माहिती नाही की मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. मोदी माझ्या बैठकीला हजर होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हाच अरुण जेटली दिल्लीचे तर आत्ता केंद्रीय मंत्री असलेले अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी देशाचा अध्यक्ष आणि हे सगळे राज्यांचे अध्यक्ष असं आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केलं. तेव्हा लोकांना ते लक्षातही आलं नाही. पण यावेळी त्याची चर्चा सुरू झाली. तात्पर्य एकच, की या ठिकाणी राजकारण आणायचं नाही”, असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

खेळाडूंना प्रोत्साहित केलं पाहिजे. आम्हा लोकांचं काम खेळाडूंना हव्या असलेल्या सुविधा पुरवायच्या हे आहे.त्यांच्या खेळात आम्ही कधी पडत नाही. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर यांच्यासारखं उभं आयुष्य क्रिकेटला योगदान दिलेल्या लोकांच्या ज्ञानाचा उपयोग नवीन खेळाडू निवडणं आणि त्यांना तयार करणं यासाठी व्हायला हवा. हे काम त्यांचं आहे. त्यांना उद्या स्टेडियम बांधायचं काम जमणार नाही.ते काम आमचं आहे. कोणते खेळाडू निवडायचे हे काम त्यांचं आहे”, अशा शब्दांत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

About Editor

Check Also

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा, तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाई नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले

नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *