कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचे मतही पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणाले की, आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, खाद्य तेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे. त्यात भरीस भर पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर घालत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
पत्रात पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले जात आहे. आज पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहे. मागील १० दिवसांत सलग चौथ्यांदा ही वाढ केली जात आहे. आज घडीला मुंबईत १११.१२ रू. प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे तर डिझेल ९६.८६ रु. प्रति लिटर मिळत. त्यामुळे या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या संकटसमयी आपण पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.
जयंत पाटील शेवटी पत्रात म्हणाले की, राज्य सरकार इंधनावर व्हॅट आणि सरचार्ज आकारते जे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे. राज्यात पेट्रोलवर अंदाजे २५% व्हॅट + ₹१०.१२ प्रति लिटर सरचार्ज लावला जातो तर डिझेलवर अंदाजे २४% व्हॅट + ₹३.०० प्रति लिटर सरचार्ज लावला जातो. राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करून टाकावा. यामुळे आज १११ रुपयांना मिळणारे पेट्रोल व डिझेल थेट ७०-८० रुपयात मिळू शकते. असे झाल्यास या कठीण काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
Marathi e-Batmya