दोन दिवसांखाली लातूरमध्ये महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची पत्रकार परिषद होती. परंतु त्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या त्या रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडीओचा निषेध छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचे राजकिय पडसाद उमटायला सुरुवात झाली. त्यातच महाराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिनाचे औचित्य साधत माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रमी खेळतानाचा त्या व्हायरल व्हिडिओ ज्याने प्रसारीत केला त्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा देत राजीनामा देण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.
माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांना राजीनाम्याच्या चर्चेबद्दल विचारले असता, असा कोणताही विचार नसल्याचे सांगत रमीच्या कथित व्हिडिओबाबत बोलताना म्हणाले की, मी रमी खेळत नव्हतो, मला रमी खेळता येत नाही, मी फोन सुरु केला आणि त्यावर गेम सुरु झाला. फोन नवीनच असल्याने मला तो गेम स्किप करता आला नाही. तेवढ्यात तो कोणी त्याचा व्हिडीओ चित्रीत केला आणि अधिवेशनानंतर व्हायरल केला.
पुढे बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, तो फार किरकोळ विषय आहे. मात्र त्याची इतकी चर्चा का होतेय तेच मला कळत नाही. मी त्यावर या आधीच खुलासा केला आहे. तुम्हाला रमी हा काय प्रकार आहे ते माहिती आहे का ? असा गेम खेळताना तुमचा फोन नंबर, बँक खाते नंबर नोंदणी करावा लागतो. हा गेम आल्यापासूनची माहिती तुम्ही तपासा, माझा नंबर किंवा बँक खाते अशा गेमशी संलग्न आहे का हे तपासा मी तुम्हा प्रसारमाध्यमांना माझा फोन आणि बँक खाते क्रमांक देतो, तुम्ही चौकशी करा असेही यावेळी सांगितले.
माणिकराव कोकाटे पुढे बोलताना म्हणाले की, हा गेम सुरु झाल्यापासून आतापर्यंत मी एक रूपयाचाही रमी गेम खेळलेलो नाही. मुळात मला हा गेमच खेळता येत नाही. त्यामुळे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून माझी बदनामी करणं चुकीचं आहे. ज्यांनी माझ्यावर असे खोटे आरोप केलेत. त्यांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
शेवटी बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, मी सभागृहात रमी खेळलो असे वाटत असेल तर याप्रकरणी तपास करावा. मी ऑनलाईन रमी खेळत असेन, मी त्यात दोषी आढळलो आणि त्यानंतर मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनी येणाऱ्या नागपूरात निवेदन केले तर मी थेट राज्यपालांकडे जाऊन मंत्रिमंदाचा राजीनामा सादर करेन असेही यावेळी जाहिर केले.
दरम्यान शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा देण्यावरून शेतकऱ्यांना भिकारी संबोधल्याबाबत बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांकडून शासन एक रूपया घेतं सरकार शेतकऱ्यांना रूपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे, शासन भिकारी आहे, शेतकरी नाही असे वक्तव्यही यावेळी केले.
माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून आता नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Marathi e-Batmya