Breaking News

नाना पटोले यांचा आरोप,…शेतकऱ्यांच्या नावानेही पैसा खाल्ला न्यायालयाने वेळेत निकाल दिला असता तर राज्य सरकारचा निकाल लागला असता: बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांच्या भारत जोडो व भारत जोडो न्याय यात्रेमुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. पण विधानसभेची लढाई सोपी नाही. केंद्रात व राज्यात विरोधकांची सत्ता आहे. धनशक्ती व सत्तेचा गैरवापर करण्यात महायुती कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे गाफील राहू नका. महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची असून, राज्यातील सत्ताबदलाचे हादरे दिल्लीलाही बसणार आहेत, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

विधानसभा निडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अमरावती येथे अमरावती व यवतमाळ जिल्ह्याची बैठक संपन्न झाली, यावेळी व्यासपीठावर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, गोवा दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, CWC सदस्य माजी मंत्री यशोमती ठाकूर, आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआय अध्यक्ष आमिर शेख, खा. बळवंतराव वानखेडे, खा. प्रतिभा धानोरकर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, अनिस अहमद, प्रा. वसंत पुरके, माजी आमदार विरेंद्र जगताप, अमरावती शहराध्यक्ष बबुल शेखावत, जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलु देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढून त्यातूनही पैसा खाल्ला आहे. महाराष्ट्राला बेरोजगारांचे राज्य बनवले आहे. भाजपा युती सरकारचे विकासाचे मॉडेल हे केवळ दिखावा आहे. विकासाच्या नावाखाली सर्रास लुट सुरु आहे. महाराष्ट्राला वाचविण्यासाठी आता भ्रष्ट सरकारला पायऊतार करावेच लागेल.

विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, लोकसभेत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी झाली आहे आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे यश दिमाखदार असले पाहिजे. महायुती सरकार बेकायदेशीर आहे. न्यायालतील निकाल वेळेवर लागला असता तर सरकारचाच निकाला लागला असता. महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर विधानसभेत काँग्रेसने आवाज उठवला पण सरकारने उत्तर दिले नाही. आता या सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल जनतेत जाऊन करू.

यावेळी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वधर्मसमभाव माननारा आहे पण आरएसएसचा सर्वधर्म समभावावर विश्वास नाही, त्यांचे स्वयंसेवक संविधान मानत नाहीत पंतप्रधान हे ही स्वयंसेवक आहेत. लोकसभेत बहुमत नसल्याने भाजपा सध्या राज्यघटना बदलू शकत नाही पण हा धोका टळलेला नाही असा इशारा वासनिक यांनी दिला. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहारमध्ये अपेक्षित यश मिळाले असते तर एनडीएचे सरकार आलेच नसते. विधानसभा निवडणुकीत आता एकत्र येऊन संपूर्ण ताकदीने महायुतीला पराभूत करण्यासाठी कामाला लागा.

उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता काँग्रेसच्या पाठीशी नेहमीच उभी राहिली असून विदर्भातील जनताही काँग्रेस व गांधी कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे असते. ज्या पद्धतीने प्रदेश काँग्रेस कमिटी काम करत आहे ते उल्लेखनिय आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य आणले आहे त्याचा फायदा निवडणुकीत झाला. विदर्भासह राज्यात नवचैतन्य दिसत असून काँग्रेस पक्षाला विदर्भासह राज्यात विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही यावेळी राज्यातील सरकारवर चौफेर टीका करत राज्यात परिवर्तन करून महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचे आवाहन काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *