मराठी ई-बातम्या टीम
राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यान वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केल्यानंतरही संख्येत घट येण्याऐवजी त्यात वाढच होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात कधीही लॉकडाऊन जाहीर केला जावू शकतो अशी अटकळ बांधण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली असून ते म्हणाले, लॉकडाऊन लावण्यासंदर्भात कोणताही विचार झालेला नाही. मात्र तशी परिस्थिती उद्भवली तर तो पर्याय आपल्यासमोर आहे.
पुण्यातही रुग्ण वाढू लागले आहेत. ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढत आहे ते पाहता एकूण महाराष्ट्रातली सध्याची स्थिती स्फोटक आहे. अशा स्थितीत आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून आपण काही निर्बंध लावलेच पाहिजेत, या मताचे मुख्यमंत्री आहेत. आणि ते निर्बंध लावले गेल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात काही निर्बंध लागू झाले आहेत. आणि राहिला प्रश्न संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा.. तर असा अजिबात कोणताही विचार नाही. निर्बंध मात्र शंभर टक्के कडक करावे लागतील. पण लॉकडाऊन हा विषय समोर नाहीच. जर तशी परिस्थिती उद्भवली, तर तसा पर्याय आपल्यासमोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील पत्रकार परिषदेत बोलताना मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात सूचक इशारा देत म्हणाल्या की, सर्वांनी जर सर्व नियमांचे पालन केले योग्य ती काळजी घेतली आणि सर्वजण जबाबदारीने वागले तर आपल्याकडे लॉकडाउन होणार नाही. पण जर दररोजच्या रूग्णसंख्येने २० हजारांचा आकाडा ओलांडला तर मात्र केंद्राने दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल. मुख्यमंत्री एक-दोन दिवसांमध्ये करोना परिस्थितीवर बोलू शकतात. कारण, रूग्ण संख्या तीन-चार पटीने वाढत असल्याचे त्यांनी जाणीवपूर्वक सांगितले.
तर मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात निर्बंध १०० टक्के कडक करावे लागतील. या कठोर निर्बंधांचं नेमके स्वरूप काय असेल, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे.
Marathi e-Batmya