पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होऊन आज दुसरा दिवस सुरु झाला. सकाळी प्रश्नोत्तराचा तासाची घोषणा करताच शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांसदीय लोकशाही राबविणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार आहे पण विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावरील व्यक्तीची निवड अद्याप करण्यात आला नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.
त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भास्कर जाधव यांना उद्देशून म्हणाले की, भास्कर राव या संदर्भात आपण माझ्या दालनात आला होतात, त्यावेळी यावर आपल्यात सविस्तर चर्चा झालेली आहे. तसेच मी तुम्हाला हे ही सांगितले आहे की, विरोधी पक्षनेते पद निवडीचा अधिकार माझा आहे. त्यासंदर्भातील निर्णय मी योग्यवेळी जाहिर करणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावरून सभागृहात चर्चा सुरु करून त्यावर काय साध्य करायचे आहे असा सवाल यावेळी उपस्थित केला.
त्यानंतर भास्कर जाधव यांनी पुन्हा आपल्या जागेवर उठून म्हणाले की, मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. तसेच मी आपल्याला विनंती करून बोलायला उठून उभे राहिलो. तरी तुम्ही मला बोलयाची संधी देत नाही. मी हात जोडून तुम्हाला विनंती केली. पण विरोधी पक्षनेते पदावरील व्यक्तीची निवड आपण कधी करणार आहात हा ५ मिनिटाचा विषय आहे. तरीही तो तुम्ही जाहिर करत नाहीत आहात, तिकडे दिल्ली विधानसभेत आपचे सरकार असताना भाजपाचे फक्त ३ आमदारे होते. तरीही आप सरकारने विरोधी पक्षनेते पद भाजपाच्या माणसाला दिले. मग आपल्याकडे तर विरोधकांकडे संख्याबळ तीनपेक्षा जास्त असतानाही आपण त्याबाबतचा निर्णय घेतला जात नसल्याकडे लक्ष वेधले.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते पदावरील व्यक्तीची निवड करण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांचे आहेत. त्यामुळे विश्वास ठेवा की, विधानसभा अध्यक्ष योग्य वेळी तो निर्णय जाहिर करतील, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अध्यक्ष महोदय आतापर्यंत सहा अधिवेशनं झाली. पण अद्याप निर्णय झाला नाही. देशाचे सुपुत्र आणि सरन्यायाधीश भूषण गवई विधिमंडळात येत आहेत. त्यांचे स्वागत करण्यास आम्हीही उत्साही आहोत. पण सभागृहात जर विरोधी पक्षनेताच नसेल तर त्यांच्यासमोर कसे दिसेल. त्यामुळे अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता निवड कधी जाहिर करणार किंवा त्याबाबतची तारीख तरी जाहिर करावी अशी मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राच्या विधान भवनात येत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणाऱ्या सरकारचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून निषेध केला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे हे विधिमंडळाच्या प्रथा -… pic.twitter.com/uczzZgH1Vy
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 8, 2025
जयंत पाटील यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जयंतराव तुम्ही असे कसे काय म्हणता, विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीची तारीख जाहिर करावी म्हणून, विधानसभा अध्यक्ष निष्पक्ष आहेत हे आपण सर्वांना माहित आहे. त्यासंदर्भात ते योग्य वेळी निर्णय़ जाहिर करतील. त्यामुळे तुम्ही त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका असेही यावेळी सांगितले.
त्यानंतर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे पहिल्यांदाच सभागृहात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी विरोधकांकडून प्रातिनिधीक प्रतिनिधी म्हणून विरोधी पक्षनेता असणे आवश्यक आहे. जर त्यासंदर्भातील कोणतीही घोषणा किंवा त्यासंदर्भात कधी निर्णय घेणार त्या अनुषंगाने आपण काहीच सांगत नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण विधानसभेच्या कामकाजावर सभात्याग करत असल्याचे सांगत सर्व विरोधी पक्षांनी विधानसभेच्या कामकाजातून बाहेर पडले.
Marathi e-Batmya