शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
वास्तविक पाहता काही वर्षांपूर्वी एसटी महामंडळाच्यावतीने राज्यातील बहुतांश गावांतील मधील शाळांमध्ये आणि शहरी भागातील शाळांमध्ये ग्रामीण भागातून शहरांमध्ये शिक्षणासाठी येत असतात. अशा विद्यार्थ्यांना सुलभ पद्धतीने सहजरित्या येता यावे यासाठी एसटी महामंडळाकडून शाळेत-महाविद्यालयात येऊन मासिक पासेसचे वितरण केले जात असे. मात्र कोविडपासून हि योजना जवळपास बंद पडली. आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही योजना पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेतला.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जुन पासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जात असत. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा – महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. यामुळे त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाच्या माध्यमातून “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम १६ जुन पासुन राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन पासची आवश्यकता असणाऱ्या शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.
या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार असल्याचेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे.
Marathi e-Batmya