मुंबईः प्रतिनिधी
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा एकदा संधी मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी २१ मे रोजी देशातील रालोआचे घटक पक्ष नसलेल्या आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांची दिल्लीत बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
२०१४ साली संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून जनतेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या हाती केंद्राची सत्ता सोपविली. मात्र मागील ५ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी हुकूमसाही पध्दतीने राज्य कारभार करत सर्वांनाच हैरान करून सोडले. तसेच समाजात जातीय तणाव वाढीस लागला. याशिवाय देशाची अर्थव्यवस्थाही अडचणीत आली. त्यामुळे पुन्हा केंद्रातील सत्ता मोदी-शाहच्या हाती जावू नये असे जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी ठरविल्याचे त्यांनी सांगितले.
त्यासाठी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल, तेलगू देसम पार्टी, तृणमूल काँग्रेस, जनता दल (यु.), डिएमके, माकप, भाकप यासह अनेक छोट्या मोठ्या पक्षांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न पवार यांनी सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच निवडणूकीचा निकाल जरी २३ मे रोजी जाहीर होणार असला तरी त्यानंतरचे किमान १० दिवस सरकार स्थापन करण्यासाठी लागणार आहेत. या १० दिवसात या सर्व प्रादेशिक राजकिय पक्षांसह काँग्रेसला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा शरद पवार यांच्याकडून केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya