मराठी ई-बातम्या टीम
आम्ही हे अगोदरपासूनच म्हटलेलं आहे की, जर कोणता विरोधकांचा एक फ्रंट बनत असेल, तर काँग्रेसशिवाय तो शक्य नाही. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत, त्यांचा एक कार्यक्रम तयार होत आहे. मला वाटतं की जास्त बोलणं इथे योग्य नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, नंतर मी तुम्हाला सांगेन. विरोधकांच्या बैठकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मी राहुल गांधी यांना सांगितलं आहे की, तुम्ही याबाबतीत पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही पुढे येऊन याबाबतीत उघडपणे काम केलं पाहिजे अशी सूचना आपण राहुल गांधी यांना केल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणूकीच्यादृष्टीने देशात विरोधकांची आघाडी तयार करण्याचा प्रयत्न सध्या वेगवेगळ्या राजकिय पक्षांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार होते. त्यानुसार त्यांनी भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलत होते.
काँग्रेसशिवाय एकजुट होऊ शकत नाही. जर कुणी अशाप्रकारे वेगळा फ्रंट निर्माण करेल, तर काँग्रेसच्या नेतृत्वात दुसरा फ्रंट तर काम करेलच ना. त्यांच्यासोबत आजही अनेक राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आहेत. मग विरोधकांचे तीन-तीन फ्रंट काय करतील? असेही ते म्हणाले.
मुद्दा केवळ उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा नाही तर राष्ट्रीय राजकारणाचा आहे. मी केवळ म्हणतोय की विरोधकांचा एकच फ्रंट असायला हवा. नेतृत्वासंदर्भात एकत्र बसून तुम्ही चर्चा करू शकतात, मात्र जर का दोन-तीन फ्रंट तयार झाले तर हा पर्याय असू शकत नाही. आम्ही भूमिकेवर कायम आहोत. एकच फ्रंट बनेल, एकच फ्रंट बनला पाहिजे आणि जेव्हा एक फ्रंट बनेल, तेव्हाच आपण एक समर्थ पर्याय उभा करू शकतो. आम्ही सर्वजण एकसाथ आहोत, एकसाथ राहू असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी जेव्हा मुंबईत येतील तेव्हा जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामकाज सुरू केलेलं असेल, तर नक्कीच या दोघांची भेट होईल. प्रियंका गांधी यांची मी उद्या भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगत तृणमूल काँग्रेसला आघाडीत सहभागी कऱण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यासाठी शरद पवार पुरेसे आहेत.
Marathi e-Batmya