संजय राऊत, अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच दोघांचाही जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत आज पीएमएलए न्यायालयाने कोठडीत वाढ केली. राऊत यांना २ नोव्हेंबर पर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित १०० कोटी वसूली प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाला. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन देण्यास पीएमएलए न्यायालयाने नकार दिला. या दोघांच्या याचिकांवर आज पीएमएलए न्यायालयाने निकाल देत अनिल देशमुख आणि संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचे स्पष्ट झाले.

कथित १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वीच ‘ईडी’च्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला होता. मात्र, सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, आज सीबीआय न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.

देशमुख यांच्यावरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. देशाच्या अर्थ व्यवस्थेवर परिणाम करणारा आहे. देशमुख यांना कारागृहात योग्य ते वैद्यकीय उपचार मिळत आहेत. शिवाय प्रकरणातील माफीचा साक्षीदार झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जबाबाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांचा जबाब महत्त्वाचा आहे, असे विशेष सीबीआय न्यायालयाने देशमुख यांना जामीन नाकारताना नमूद केले.

अनिल देशमुखांवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सध्या अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ‘ईडी’नेही या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप ‘ईडी’कडून करण्यात आला होता.

तर पत्रावाला चाळ गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचानलयाच्या अर्थात ईडी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयाने झटका दिला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दसऱ्या पाठोपाठ संजय राऊत यांची दिवाळीही तुरुंगातच जाणार असल्याचे स्पष्ट झाले.

गोरेगाव येथील कथित पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज २१ ऑक्टोंबर रोजी सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत २ नोव्हेंबरला ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊतांना आजही दिलासा मिळाला नाही.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी, शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड निर्माण करा शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी हे अभियान अभिनव ठरेल

शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचे केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *