प्रवासी वाहनांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर प्रदेशासाठी १८००२२०११० टोल फ्री क्रमांक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची निवेदनाद्वारे माहिती

शहरातील ऑटोरिक्षा,टॅक्सी,ओला-उबर,प्रवासी वाहने तत्सम प्रवासी वाहनांसंदर्भात भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दटपणे वागणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, बॅज प्रदर्शित न करता वाहन चालविणे, अतिरिक्त भाडे आकारणे अशा प्रकारच्या प्रवाशांच्या तक्रारींचे निरसन करता यावे. बेशिस्त चालकांविरुध्द कारवाई करता यावी, याकरिता संपूर्ण मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी प्रवासी टोल फ्री क्रमांक १८००-२२०-११० सुरु करण्यात आला आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत सांगितले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम), अंधेरी येथे नियंत्रण कक्ष २४ तास सुरु आहे. परिवहन विभागामार्फत प्रथमच अशाप्रकारे नागरिकांसाठी सेवा सुरु करण्यात येत आहे. या कक्षाला प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयास ई-मेलद्वारे अवगत करण्यात येते. दोषी आढळलेल्या वाहन मालकांना नोटीस पाठविण्यात येऊन कारवाई करण्यात येते. त्यांची सुनावणी घेऊन दोषी वाहनांची नोंद ब्लॅकलिस्टमध्ये घेण्यात येते. ब्लॅकलिस्टमध्ये नमूद वाहनांवर दंडात्मक कारवाई होईपर्यंत वाहनांसंबंधीचे पुढील कोणतेही कामकाज करण्यात येत नाही.

शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, ही कारवाई यापुढे देखील प्रभावीपणे चालू राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांनी ऑटोरिक्षा, टॅक्सी, ओला-उबर,प्रवासी बसेस सारख्या प्रवासी वाहनांसंदर्भात काही मदत हवी असल्यास या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. मुंबई महानगरातील वाहतूकीबाबत सुलभ सेवा निर्माण करण्याकरिता नागरिकांनी या टोल फ्री सेवेचा लाभ घेऊन परिवहन विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही केले.

About Editor

Check Also

मजूर संस्थांसोबतच महिला सहकारी संस्थांना कामे देणार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली ग्वाही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ५ सदस्यीय समिती गठित

राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे राज्यातील मजूर सहकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *