एकनाथ शिंदेंना समर्थन देणाऱ्या भावना गवळी यांची अखेर शिवसेनेकडून उचलबांगडी संसदेतील प्रतोद पदी खासदार राजन विचारे यांची नियुक्ती

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाल्यानंतर एकाबाजूला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच राष्ट्रपती पदासाठी भाजपाच्या उमेदवार द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिल्यानंतर आता खासदार ही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे समर्थन करणाऱ्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांची शिवसेनेच्या लोकसभेतील प्रतोद पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. तसे पत्रही शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज जारी केले.

शिवसेनेच्या लोकसभेतील प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी करत खासदार राजन विचारे यांची पक्षाच्या लोकसभा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलेलं पत्र सध्या व्हायरल होत आहे.

महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू होण्याच्याही आधी भावना गवळी ईडीच्या रडारवर होत्या. त्यांना ईडीकडून नोटीस देखील बजावण्यात आली होती. त्यानंतर भावना गवळी यांनी दोन वेळा त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वर्षा बंगल्यावर जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी भावना गवळी यांनी पत्र लिहित महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपाशी जुळवून घेण्याचे आवाहन उध्दव ठाकरे यांना केले होते. सध्या एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना ईडीची भिती दाखवून तिकडे वळवण्यात आल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर लोकसभेत देखील शिवसेनेला विधानसभेप्रमाणेच पेचप्रसंगाचा सामना करावा लागू नये, यासाठी खबरदारी म्हणून शिवसेनेनं हे पाऊल उचलल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दोनच आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या बंडखोरीनंतर भावना गवळी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून शिंदे गटाच्या कलाने निर्णय घेण्याची विनंती केली होती. आपले आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्यासाठी विनंती करत आहेत. त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता कठीण असला तरी शिवसैनिकांसाठी निर्णय घ्यावा ही विनंती, अशा आशयाचं पत्र गवळी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलं होते.

सजंय राऊत यांनी लोकसभाध्यक्षांना लिहिलेले हेच ते पत्र:-

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *