मुंबईः प्रतिनिधी
राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ५०२ शासकिय आदीवासी आश्रमशाळांपैकी ५० आश्रमशाळांमध्ये १ ली पासून इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात २ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेता येणे सुलभ होणार असल्याची माहिती आदीवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी दिली.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री परिणय उके, विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा उपस्थित होते.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे आदीवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा व वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील आदीवासी विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांचे मेडिकल, पँरामेडिकल, अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण अशा शाखांमध्ये प्रमाणही वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय वर्धा येथे नविन एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरु करण्यात येणार असून विदर्भात एकूण २९ प्रकल्प कार्यालये कार्यरत आहेत. या कार्यालयासाठी ३१ पदेही निर्माण करून ती उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय आदीवासी वित्त व विकास महामंडळास मिळालेल्या ५० कोटी रूपयांस राज्य सरकारने राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळास हमी दिलेली आहे. या रकमेतून आदीवासी बेरोजगार युवकांकरीता स्वंयरोजगाराच्या विविध योजना राबविण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्याचबरोबर या रकमेतून नव्या स्वयंरोजगार उत्पन्न निर्मिती योजना राबविण्यासाठी केंद्राकडून सवलतीच्या दरात कर्जही उपहब्ध करून घेता येणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शबरी गृहनिर्माण योजनेंतर्गत आदीवासी समाजातील नागरीकांसाठी ११ हजार घरे बांधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya