मुस्लिम पुरूषाला एकापेक्षा अधिक लग्न करण्यास मुस्लिम धर्मीयांच्या वैयक्तिक कायद्याने परवानगी आहे. त्यामुळे, मुस्लिम पुरूषाने एकापेक्षा अधिक विवाह केले असतील तर महाराष्ट्र विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणी योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
अल्जेरियन महिलेसोबत केलेल्या तिसऱ्या विवाहाची नोंदणी करण्यास ठाणे महानगरपालिकेने नकार दिल्यामुळे याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विवाहाची नोंदणी करण्याचे आदेश महापालिकेला देण्याची मागणी प्रमुख मागणी याचिकेतून केली होती. त्याची दखल घेऊन न्या. बर्गिस कुलाबावाला आणि न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दिलासा देताना उपरोक्त आदेश दिले.
कायद्यानुसार एकदाच विवाह नोंदणीस मूभा आहे. परंतु, याचिकाकर्त्याने तिसरा विवाह केल्यामुळे विवाह नोंदणीस नकार दिला. शिवाय, याचिककर्त्या जोडप्याने आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नसल्याचा दावाही महानगरपालिकेने सुनावणीच्यावेळी केला होता. यापूर्वी मोरोक्कन नागरिकास त्याच्या दुसऱ्या विवाहाची नोंदणी करण्यास महापालिकेने परवानगी दिल्याची बाब याचिकाकर्त्यांतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे, विवाह नोंदणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे आपण सादर केली असून महापालिकेने सांगितल्यास अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यासही तयार असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाने याचिकाकर्त्या जोडप्याचा युक्तिवाद योग्य ठरवला. मुस्लिम पुरूषाने एकापेक्षा अधिक विवाह केल्यास त्याची नोंदणी करण्यापासून कायद्याने त्यांना रोखल्याचे कुठेही नमूद नाही. किंबहुना, पक्षकारांचा विवाह हा त्यांच्या धार्मिक कायद्यानुसार केला आहे का याची खात्री करणे नोंदणी विवाह करणाऱ्या अधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. याशिवाय, मुस्मिम पुरुषाला चार विवाह करण्याची परवानगी त्यांच्या धार्मिक कायद्याने दिली आहे. दरम्यान, महापालिकेचा युक्तिवाद स्वीकारल्यास मुस्लिम धर्मीयांच्या वैयक्तित कायद्याचे उल्लंघन होईल, दुसरीकडे,, विवाह नोंदणी कायद्याने त्यांना एकापेक्षा अधिक विवाहांची नोंदणी करण्यास मज्जाव केलेला नाही. त्यामुळे, ठाणे महापालिकेने दहा दिवसांत याचिकाकर्त्यांना वैयक्तिक सुनावणी देऊनत्यांच्या विवाह नोंदणीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असेही आदेश न्यायालयाने दिले.
Marathi e-Batmya