केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जागतिक स्तरावर “दादागिरी” (धमकावणे) करणारे देश त्यांच्या आर्थिक प्रभावामुळे आणि तांत्रिक बळामुळे असे करू शकतात. त्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा भारत अमेरिकेकडून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या शुल्काचा सामना करत आहे.
शनिवारी नागपूरमधील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (व्हीएनआयटी) बोलताना नितीन गडकरी यांनी भारताला निर्यात वाढवण्याचे, आयात कमी करण्याचे आणि आत्मनिर्भरतेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करत म्हणाले की, जे ‘दादागिरी’ करत आहेत ते असे करत आहेत, कारण ते आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे. जर आपल्याला चांगले तंत्रज्ञान आणि संसाधने मिळाली तर आपण कोणालाही धमकावणार नाही, कारण आपली संस्कृती आपल्याला शिकवते की, जगाचे कल्याण सर्वात महत्वाचे असल्याचे सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर अमेरिका-भारता दरम्यानच्या व्यापार तणावात वाढ झाल्यानंतर नितीन गडकरी यांचे वक्तव्य आले आहे. यामुळे भारत अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या व्यापारी भागीदारांपैकी एक बनला आहे, ज्यामध्ये कापड आणि रत्नांपासून ते औषध आणि ऑटो पार्ट्सपर्यंतच्या क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे.
व्हाईट हाऊसने या दंडांचा संबंध नवी दिल्लीने रशियन तेलाच्या सतत खरेदीशी जोडला आहे – ही भूमिका भारताने आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील दोन दशकांमधील सर्वात तीव्र राजनैतिक वाद निर्माण झाला आहे, वॉशिंग्टनने व्यापार चर्चा स्थगित केली आहे आणि पुढील निर्बंधांचा इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून केलेल्या एका स्पष्ट संदेशात म्हटले आहे की, भारत आपल्या शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध कामगारांच्या कल्याणाशी कधीही तडजोड करणार नाही, जरी त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागली.
“आमच्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांचे हित आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात म्हटले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही अमेरिकेच्या उपाययोजनांवर टीका केली आणि असे सुचवले की काही शक्ती भारताच्या जलद वाढीबद्दल अस्वस्थ आहेत. अमेरिकेला “सबका बॉस” असे संबोधून ते म्हणाले, “भारतात बनवलेले उत्पादने अधिक महाग व्हावीत जेणेकरून जगाने ती खरेदी करणे थांबवावे यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. परंतु आता कोणतीही शक्ती भारताला एक प्रमुख जागतिक शक्ती होण्यापासून रोखू शकत नाही.”
भारताने या शुल्कांना “अयोग्य, अन्याय्य आणि अवास्तव” म्हटले आहे आणि आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी “सर्व आवश्यक उपाययोजना” करण्याचे वचन दिले आहे.
Marathi e-Batmya