मुंबईः प्रतिनिधी
गतवेळच्या मान्सूनमध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच राज्यातील जनतेला दुष्काळी परिस्थितीचे चटके जाणवू लागले. तर मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावू लागले. त्यातच यंदा राज्यातील मान्सून उशीराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान कंपनीने व्यक्त केला.
मान्सूनचे आगमन केरळमध्ये चार जूनला होण्याची शक्यता व्यक्त करत सरासरीच्या ९३ टक्के पावसाचा अंदाजही स्कायमेटने व्यक्त केला आहे. तर २२ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे यंदाचा मान्सून महाराष्ट्रात उशीर दाखल होणार असल्याची माहिती स्कायमेटकडून देण्यात आली. त्यामुळे १० जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून लांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सुशांत पुराणिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होणार असा अंदाज होता पण तो आता लांबणीवर जाणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. पण यंदा महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती बिकट राहिल अशी माहितीही त्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात मान्सून सरासरीच्या ९३ टक्के पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचं म्हटलं होतं. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं.
हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार, ‘अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो.’ यंदा सरासरीच्या ९५ ते १०४ टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.
Marathi e-Batmya