मराठी ई-बातम्या टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजपा आमदार गोपीनाथ पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याप्रश्नी बैठका घेवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाले. परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनेकवेळा कर्मचाऱ्यांना इशारे देवून संप मागे घेण्याचे आवाहन करूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप काही केल्या मिटण्यास तयार नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी देण्याच्या अनुषंगाने एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज पत्रकार परिषद घेत बडतर्फीची कारवाई करण्याआधी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे अन्यथा एकदा कारवाई केल्यानंतर परत कामावर घेणे अवघड असल्याचा इशारा संपकऱ्यांना दिला.
संप सुरू झाला तेव्हा पटावर ९२ हजार कर्मचारी होते. त्यानंतर रोजंदारीवर असलेल्या २००० लोकांची सेवासमाप्ती झाली. काल १३ जानेवारी रोजी ३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ झालेत. साधारणतः या काळात संप केल्याने आणि इतर काही कारणाने आम्हाला ५००० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त कराव्या लागल्या. साधारणतः ८७ ते ८८ हजार कर्मचारी आता पटावर आहेत. यापैकी २६ हजार ५०० कर्मचारी आता कामावर असल्याने त्यांनी सांगितले.
बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या पुन्हा वापसीचा काही मार्ग आहे का असा प्रश्न विचारला असता ते म्हणालेकी, बडतर्फ कामगारांना पुन्हा सेवेत घेता येत नाही असे स्पष्ट केले.
बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्यासाठी काही प्रक्रिया आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील आधी सांगितले होते की, बडतर्फ झाल्यावर त्याला कामावर घेता येत नाही. ती तेवढी सोपी प्रक्रिया नाही. म्हणूनच कर्मचाऱ्यांना आमचे आवाहन आहे की अशाप्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्याची वेळ येऊ नये. त्यांना यातून पुढे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रूजू व्हावे. बऱ्याच कर्मचाऱ्यांची कामावर हजर होण्याची इच्छा आहे. ते रुजू होत आहेत. सध्या महाराष्ट्रात सकारात्मक चित्र दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, तर त्यांच्यावर कारवाई करणार नाही. ७५० खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. जे सेवानिवृत्त झाले आहेत, ज्यांचे वय ६२ पेक्षा कमी आहे, जे फिट आहेत त्यांना काही काळ कामासाठी घेणार आहोत. एसटी सेवा प्रवाशांना मिळावी हा खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya