अजित पवार म्हणाले की, उत्‍तर महाराष्‍ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा चान्स गेला भाजपाच्या नेत्यांना चिमटे, टोलेबाजीने

विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बोलल्यानंतर उर्वरीत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच विरोधकांची चांगलीच फिरकी घेत टोलेही लगावले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, काही काळा आधी उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री होण्याची संधी होती (खडसेंबाबत उद्देशून बोलत). मात्र आता ती गेली. मात्र आता पुढची संधी कधी मिळेल माहीत नाही मात्र पुढचे दिल्लीला गेल्याशिवाय ही संधी मिळेल असे वाटत नाही असा चिमटा भाजपाचे गिरीष महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता काढला.

महाराष्‍ट्राच्या निर्मितीला ६२ वर्षे झाली.त्‍यातील ३२ वर्षे विदर्भ-मराठवाडयातील मुख्यमंत्री होते. कोकणाला १० वर्षे मिळाली. २० वर्षे पश्चिम महाराष्‍ट्राला मिळाली. अदयाप उत्‍तर महाराष्‍ट्राला मात्र मुख्यमंत्रीपदाचा चान्स मिळाला नाही. मागे एकदा मिळणार होता. मात्र त्‍यांचा चान्स गेला. दुसरा तयार होत होता. पण त्‍यांचा चान्स कधी येईल तर त्‍यांचा पुढचा जेव्हा दिल्‍लीला जाईल. पण आता असे म्‍हणालो तर देवेंद्र फडणवीसांच्या डावीकडे बसणारे नाराज होतील असे अजित पवार म्हणाल्यानंतर भाजपाच्या सदस्यांसह सत्ताधारी बाकावरील सदस्य चांगलेच हास्यकल्लोळात बुडाले. मात्र भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांचीही आपण सर्व कामे केली असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

ते पुढे म्हणाले की, वाईन विक्रीचा निर्णय घेतला असला तरी त्‍याची अदयाप अंमलबजावणी सुरू झालेली नाही. वाईन विक्रीसाठी कोणतीही सक्ती केली जाणार नाही. त्यांना मान्य असेल तरच ते वाईनची विक्री करू शकतील, असा खुलासाही त्‍यांनी केला.

विदर्भ-मराठवाडयावर या सरकारने कोणताही अन्याय केलेला नसल्‍याचे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्‍हणाले, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. या मंडळांची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली असली तरीही सरकार विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय होऊ देणार नाही. विदर्भाला राज्‍यपालांच्या निर्देशानुसार निधी देण्यात येतो. २०२१-२२ मध्ये विदर्भाला २६ हजार कोटी दयायचे होते तेव्हा २९ हजार ५०० कोटी रूपयांचा निधी दिला. मराठवाडयाला २१ हजार कोटी दयायचा होता तो देखील २१ हजार कोटी दिला. उर्वरित महाराष्‍ट्राला ६६ हजार कोटी देणे होते, त्यापैकी ६२ हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. विजेच्या संदर्भात देखील मराठवाडा-विदर्भाच्या वाटयाचे सवलतीचे १२०० कोटी रूपये देण्याचा निर्णय झाला आहे. उदयोग व्यवसाय आपल्‍या राज्‍यातून इतर राज्‍यात जावू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.

पेताडाला दारूचे दुकान बरोबर सापडते

वाईन विक्रीच्या निर्णयावरून टीका होत असते. पण ही वाईन फक्‍त सुपरमार्केटमध्ये ठेवण्यात येणार आहे. राज्‍यातील फक्‍त ४०० ते ५०० मार्केटमध्येच ती मिळेल असे सांगताना अजितदादा म्‍हणाले माझ्या आजवरच्या आयुष्‍यात मी दारूच्या एका थेंबालाही स्‍पर्श केलेला नाही. पण वाईनवर होणारी टीका अनाठायी आहे. ज्‍याला प्यायची असते तो कसाही पितोच. आपण बघतो की एखादा पेताड नव्या गावात गेला तरी तो दारूचा गुत्‍ता शोधून काढतोच. त्‍याला सांगावे लागत नाही असे सांगताना सभागागृहात एकच हास्यकल्लोळ पुन्हा उडाला.

वाईन विक्रीचा निर्णय जनतेला नको असेल तर सरकार त्यासाठी आग्रही राहणार नाही. मात्र, राज्याचा महसूल वाढवा हा हेतू या निर्णयामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

सचिन सावंत यांचा सवाल, महाराष्ट्रात एमएसआरटीसीचे विलिनीकरण कधी करणार? तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय, मविआ सरकार असताना एसटीच्या विलिनिकरणाच्या बाता मारणारे भाजपाधार्जिणे नेते आता गप्प का?

काँग्रेसच्या तेलंगणा सरकारने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *