मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या सर्व बैठका रद्द, प्रकृती बिघडली डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

मागील काही दिवसांमध्ये सातत्याने महाराष्ट्रातील वाढते दौरे, राजकिय मेळावे आणि रात्री उशीरा पर्यंत वाढलेल्या बैठका यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शाररीक आणि मानसिक तणाव वाढला. त्यामुळे त्यांची प्रकृती आज अचानक बिघडल्याने त्यांचे आजचे सर्व नियोजित शासकिय कार्यक्रम रद्दबातल करण्यात आले.

डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली असल्याने सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे सतत दिल्ली दौरे सुरु आहेत. याशिवाय महाराष्ट्र दौरा, उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभा, बैठका यामध्ये एकनाथ शिंदे सतत व्यस्त आहेत. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यांना थकवा जाणवू लागला आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीसांनीही आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीसंदर्भात दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला आणि बंडखोर आमदार अपात्र ठरले तर भाजपासमोर काय पर्याय आहेत यासंदर्भात देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, ५ ऑगस्टला राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवारी मंत्रीमंडळ विस्तार होईल असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी फक्त ज्येष्ठ आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे सात आणि शिंदे गटातील सात आमदारांचा समावेश आहे.

३० जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला होता. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी आशा होती. यासाठी एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दौरेही सुरु होते. पण महिना उलटल्यानंतरही मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने विरोधकांकडून सतत टीका होत आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *