देशात प्रचंड बेरोजगारी असताना केवळ अमित शाह यांच्या मुलालाच नोकरी

विविधतेत एकता ही या देशाची ओळख असताना ही ओळख पुसण्याचे काम मागील काही वर्षांपासून केले जात आहे. द्वेषाचे बिज पेरून समाजा-समाजाला, जाती-धर्माला एकमेकांविरोधात लढवून भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. देशात महागाई, बेरोजगारीची समस्या मोठी असताना केंद्रातील भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. अशा विपरीत परिस्थितीत भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देश जोडण्यास निघालेल्या राहुल गांधी यांच्याकडून लोकांच्या आशा, अपेक्षा व विश्वास असल्याने प्रचंड मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत, असे काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना कन्हैयाकुमार यांनी भारत जोडो यात्रेचा उद्देश स्पष्ट केला व देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, पदयात्रेत सहभागी झालेले लोक त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन जिवनातील समस्यांवर बोलत आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही अशी तरुणांची अवस्था आहे मात्र अमित शाह यांच्या मुलाला मात्र नोकरी लागते तेही नियम बदलून याचा संताप तरुणांमध्ये आहे. आपली स्वप्नं भाजपा सरकार धुळीस मिळवत आहे हे त्यांचे दुःख आहे. महागाईने महिलांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. जिवघेण्या महागाईत जगणे मुश्कील झाले आहे. जनतेच्या या समस्या असताना केंद्रातील भाजपा सरकार मात्र या मुळ मुद्द्यांना हात घालत नाही. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते इतर मुद्द्यांना महत्व देत आहेत.

सरकार जनतेचे ऐकत नाही पण राहुलजी गांधी मात्र जनतेच्या समस्या, वेदना, दुःख ऐकून घेत आहेत. आपले दुःख ऐकण्यासाठी आपल्याकडे कोणीतरी आले आहे ही भावनाच जनतेला आपलीशी वाटत आहे. भारत जोडो यात्रेचा उद्देश पवित्र व स्वच्छ असून देश तोडणाऱ्या शक्तींना देश जोडण्यातून उत्तर दिले जात आहे आणि याकामी जनतेचे मोठे समर्थन लाभत आहे. या पदयात्रेचा उद्देश केवळ निवडणुका जिंकणे नाही तर जनतेला विश्वास देण्याचा आहे, देशातील एकोपा कायम ठेवणे आहे. आपापसात भांडण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीसह आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याची लढाई लढली पाहिजे हे जनतेला आता समजले आहे, असेही कन्हैयाकुमार म्हणाले.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *