उध्दव ठाकरेंचा सवाल, काल ज्याच्या हातात धनुष्य बाण होता त्याचा चेहरा पाहिला का? एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भावनांवरून केली खोचक टीका

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाणावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून दावा करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयातही या दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे करत याचिका दाखल केल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निकाल जाहिर केला. त्यानंतर असंख्य शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेत उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याच्या घोषणा दिल्या. त्यानंतर आज पुन्हा सकाळी हजारो शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेत उध्दव ठाकरे यांना पाठिंबा असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे अखेर उध्दव ठाकरे यांना वांद्रे येथील कलानगरच्या चौकात येवून संवाद साधावा लागला. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे यांनी निकाल आल्यानंतरही ज्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाले त्यांच्या चेहऱ्यावर काय भाव होते पाहिले का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता निशाणा साधला.

निवडणूक आयोगाने निकाल जाहिर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांनी वर्षा या शासकिय निवासस्थानी धनुष्यबाण हाती घेत आनंदोत्सव साजरा केला. तर त्यानंतर तासभरानंतर उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

या दोन्ही ठिकाणचा संदर्भ देत उध्दव ठाकरे म्हणाले, काल निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर माझी पत्रकार परिषद पाहिली का? आणि ज्यांना धनुष्य बाण मिळाला आणि ज्यांच्या हाती धनुष्यबाण होता त्याचा चेहरा पाह्यला का? असा सवाल शिवसैनिकांना केला.

त्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, आयोगाच्या निकालानंतर मी पत्रकार परिषद घेतली, माझ्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. मी आजही जसा बोलतोय तसाच चेहरा माझा कालही होता. मात्र धनुष्यबाण ज्यांना मिळाले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर हाती धनुष्य बाणी धरत आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्या चेहऱ्यावर चोराचे भाव होते. आपण धनुष्य बाण चोरलेय हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होते. त्यामुळे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करणारा रावणही उताणा पडला होता अशी टीका करत एकनाथ शिंदे यांची तुलना रावणाशी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *