अजित पवारांच्या बंडानंतरही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपातील मोठ्या पक्षप्रवेशासाठी योजना तयार भाजपा आणि महायुती लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल

भारतीय जनता पार्टी आणि महायुती लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भिवंडी (जि.ठाणे) येथे प्रदेश भाजपातर्फे आयोजित महाविजय २४ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, ठाणे शहर अध्यक्ष आ.निरंजन डावखरे यावेळी उपस्थित होते. मोदी सरकारची विकास कामे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तीन नेत्यांच्या दूरदृष्टीचा फायदा होऊन महायुती ऐतिहासिक विजय प्राप्त करेल असे नमूद केले. त्याचबरोबर भाजपात मोठ्या पक्षप्रवेशासाठी योजना तयार असल्याचे सांगत आगामी काळात राजकिय पक्षांमध्ये फोडाफोडी होणार असल्याचे संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपा महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील. पार्लमेंट ते पंचायत स्तरापर्यंत आम्ही झटून काम करू. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपा अव्वल कामगीरी करेल. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपाला ज्या जागा मिळतील त्यापैकी ८० टक्के जागांवर म्हणजे १५२ जागांवर भाजपा विजयी होईल असा विश्वास बोलून दाखवला. महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी, विकासात्मक बाबी लक्षात घेऊन नियोजनबद्धरित्या भाजपा ताकदीने काम करेल अशी ग्वाही दिली.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, घर चलो अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार आहोत. आगामी निवडणुकांसाठी भाजपाची यंत्रणा युद्धस्तरावर कामाला लागली असून कामांचा आढावा घेण्यासाठी २८८ वॉररुम्स तयार आहेत. भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश व्हावेत यासाठी योजना तयार करण्यात आली आहे .

प्रदेश भाजपातर्फे आयोजित ‘महाविजय २०२४’ कार्यशाळेचे उदघाट्न प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी सी.टी.रवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. केंद्रीय लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. किसन कथोरे आदी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रास्ताविक केले.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *