बांग्लादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, बांग्लादेशामध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात जे काही घडले, ते राज्याच्या हिताचं नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण आणि राजकारणातील व्यक्तींनी सयंमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहिल, याबद्दलची खबरदारी घ्यावी, असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल. मात्र आज मला शांतता आणि सौहार्द याचं जास्त महत्त्व वाटतं. म्हणून मी अन्य बाबींवर भाष्य करू इच्छित नाही. शांतता कशी प्रस्थापित होईल, याबाबत मी अधिक आग्रही आहे. अन्य काही देशात घडणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या राज्यातील लोकांचे जीवन संकटात येईल, असे काही करू नये हे माझं आवाहन असल्याचंही यावेळी हिंदू-मुस्लिम समुदायाला सांगितलं.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व देशाच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची भूमिका मांडली. नुकत्याच जाहीर झालेल्या जम्मू काश्मीर आणि हरयाणा राज्याच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्या, मात्र महाराष्ट्राची निवडणूक अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पंतप्रधानांचा महाराष्ट्राबद्दलचा निर्णय हा विरोधाभासात्मक आहे आणि याबद्दल अधिक स्पष्टीकरण अपेक्षित असल्याची भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक स्पष्ट झाल्याशिवाय, पंतप्रधानांच्या घोषणेला योग्य प्रतिसाद देणे कठीण होईल, असा उपरोधिक टालाही यावेळी लगावला.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, अगोदर महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुका सोबत होत होत्या. मात्र तेव्हा जम्मू आणि काश्मीर विधानसभा नव्हती. आम्ही यावेळेस हरयाणा आणि जम्मू कश्मीरच्या विधानसभा निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागणार आहे. महाराष्ट्रात आता पाऊस पडला आहे. गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री आणि दिवाळी असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर केल्या नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी जाहिर केले. मात्र विधानसभा निवडणूकीच्या तारखा विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच महाराष्ट्रात निवडणुका होतील असेही यावेळी स्पष्ट केले.
शेवटी शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुका होणार आहेत, मात्र अद्याप त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, असेही यावेळी सांगितले.