शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर बदलापूरातील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच बदलापूर स्थानकात ठिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हटविण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरु केली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळू नये या उद्देशाने पोलिसांनी माघार घेतली. त्यानंतर राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरिष महाजन हे आंदोलकांशी चर्चा करायला आले. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याचे चित्र बदलापूर रेल्वे स्थानकात पाह्यला मिळाले.
बदलापूरातील घटनेची आणि गंभीर दखल राज्य सरकारने घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा निर्णय घेतला. तसेच आरोपीला कायद्यानुसार शिक्षा मिळेल अशी ग्वाहीही यावेळी दिली. तरीही आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिले. तसेच मंत्री गिरीष महाजन यांनी, पोलिसांनी आंदोलकांना समाजवून ट्रॅकवरून हटण्याची मागणी केली. मात्र आंदोलक आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत राहिले. तसेच आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा रेल्वे स्थानकात आणत त्याला प्रतिकात्मक फाशीही दिली.
तरीही आंदोलक रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास तयार होत नव्हते. या सगळ्या घडामोडीत पावसाने हजेरी लावली. तरीही आंदोलकांनी भर पावसातच आंदोलन तसेच सुरु ठेवले. त्यामुळे आंदोलन लांबणार असल्याचे चित्र निर्माण झाले. गिरिष महाजन यांच्याबरोबरील चर्चेत आंदोलकांनी केलेल्या मागण्या सर्व मान्य केल्याचे नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
परंतु काही झाले तरी आंदोलक रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास तयार होईनात अखेर संध्याकाळी ५ः४५ च्या सुमारात पोलिसांना बळाचा वापर करत आंदोलन कर्त्यांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरा दाखल आंदोलकांनी पोलिसांवर पुन्हा एकदा दगडफेकीस सुरुवात केली.
तरीही पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज करत हुसकाविण्याचा प्रयत्न सुरुच ठेवले. या सगळ्या घडामोडीत आंदोलकांनी रेल्वे स्थानकातील ट्रॅकची जागा सोडत अंबरनाथच्या दिशेने पळण्यास सुरुवात केली.
मात्र पळतानाही पोलिसांवर दगडफेक करतच होते. त्यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आंदोलकांना हुसकावून लावण्यात पोलिसांना यश आले.