मालवणमधील शिवाजी महाराज पुतळा आठ महिन्यातच कोसळून पडला. या पुतळा प्रकरणावरून राज्यातील सर्व राजकिय पक्षांनी सत्ताधाऱांना धारेवर धरायला सुरुवात केली. तसेच या घटनेवरून राजकिय कुरघोडी नाट्याला सुरुवातही झाली. यावरून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना माफी मागितली.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यास आठ महिन्याचा कालावधी लोटत नाही, तोच हा पुतळा कोसळून पडला. या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे या घटनेसंदर्भात सर्वात पहिल्यांदा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी माफी मागितली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नौदलाने या संदर्भात एक समिती स्थापन केली आहे. तसेच राज्य सरकारनेही तज्ञ शिल्पकारांचा समावेश असलेली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती संपूर्ण घटनेची चौकशी करेल आणि त्यावर काय कार्यवाही करायची यासंदर्भातील अहवालही सादर करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवाजी महाराज हे आपणा सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्यासमोर १०० वेळा नतमस्क व्हायला मला कमी पणा येणार नाही. त्यामुळे या प्रकरणी मी माफी मागतो असे सांगत पुतळा कोसळलेल्या ठिकाणी आता दुसरा भव्य पुतळा उभारण्याची गरज राज्यातील जनतेची भावना आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दुसरा पुतळा उभारण्याची आवश्यकता आहे असल्याचेही यावेळी सांगितले.
विरोधकांच्या आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून राजकारण करू नये असे माझे आवाहन असून राजकारणासाठी इतर विषय असल्याचेही यावेळी सांगितले.