पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘ पीएम सेतू ‘ या योजनेमुळे महाराष्ट्रातील आयटीआय सर्वोत्तम ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ होणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण होणार असून पुढच्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
कुशल मनुष्य़बळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी पीएम सेतू योजनेतून आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्पात नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथील आयटीआयचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकार मिळून २४२ कोटी खर्च
मंगलप्रभात लोढा पुढे बोलताना म्हणाले की, आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी हब अँड स्पोक प्रारूप विकसित केले जाणार आहे. या योजनेत केंद्र आणि राज्य सरकार मिळून २४२ कोटी खर्च करणार असून यामुळे राज्यातील आयटीआयचे रूप पालटणार आहे. या आधुनिकीकरणामुळे तरुणांना विविध क्षेत्रात दर्जेदार व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेची पुढच्या वर्षात टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी करण्यासही मान्यता देण्यात आली. योजनेकरिता केंद्र सरकारचा ५० टक्के, राज्य सरकारचा ३३ टक्के आणि उद्योग क्षेत्राचा १७ टक्के निधी असेल. आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी वरील प्रमाणे निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यात एका क्लस्टरकरिता (१ हब आयटीआय व ४ स्पोक आयटीआय) पाच वर्षाकरीता अंदाजित २४१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याकरिता केंद्र सरकारचे ११२ कोटी रुपये, राज्य शासनाचे ९८ कोटी रुपये आणि उद्योग क्षेत्राचा ३१ कोटी रुपयांचा वाटा असेल. त्यापैकी राज्य शासनाकडून पाच वर्षाकरिता करावयाच्या ९८ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली असल्याचेही यावेळी सांगितले.
पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे यांचा समावेश
पुढे बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, नागपूर येथील गव्हर्न्मेंट आयटीआय, नागपूर आयटीआयचे हब म्हणून आधुनिकीकरण केले जाईल. मुलींसाठीचे आयटीआय, नागपूर, कामटी, हिंगणा आणि बुटीबोरी येथील आयटीआयचा समावेश आहे. छत्रपती संभाजी नगर येथील आयटीआय हब म्हणून आधुनिकीकरण करणार. त्याचबरोबर पैठण, खुल्ताबाद, गंगापूर आणि फुलंब्री येथील आयटीआयचेही आधुनिकीकरण केले जाणार आहे. पुण्यातील औंध येथील आयटीआयचा हब म्हणून आधुनिकीकरण केले जाणार. औंध येथील मुलींसाठीचे आयटीआय, खेड-राजगुरूनगर आणि मुळशी येथील आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
नवीन अभ्यासक्रमासह विद्यमान अभ्यासक्रमातही सुधारणा
मंगलप्रभात लोढा म्हणाले की, एका हब आयटीआयमध्ये सरासरी चार नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून, दहा विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा केली जाणार आहे. स्पोक आय़टीआयमध्ये दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत तर आठ अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा केली जाणार आहे. उद्योगांची संख्या कमी असलेल्या ठिकाणी सेवा क्षेत्र, बहुकौशल्य अभ्यासक्रम आणि उपजिविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, गुरुकुल परंपरा, नालंदासारखी विद्यापीठे आणि आर्यभट्टांसारखे विद्वान यांच्यामुळे भारत ज्ञानार्जनाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास आले. आज त्या ज्ञानपरंपरेलाच अनुसरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची जोड देत आयटीआयच्या माध्यमातून नवा भारत घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही स्पष्ट केले.
Marathi e-Batmya