हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, २ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता तर २ ठिकाणी सत्तेत सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा विचार व संघटन विस्तारासाठी स्वबळावर लढलो

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसचा विचार व संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढवल्या. काही ठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर युती वा आघाडी करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, जे की आघाडी केल्यानं मिळू शकत नाही. जनतेने या निवडणुकीत काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निकालावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, २०१९ साली राज्यातील एका विशिष्ट परिस्थितीत महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन करण्यात आले होते, त्यानंतर २०२४ च्या विधानसभा मविआ म्हणून लढलो तर लोकसभेसाठी देशभरात भाजपाविरोधात संविधानवादी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली, पण स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीत मात्र अनेक ठिकाणी स्वबळावर लढलो. वंचित बहुजन आघाडी, ओबीसी बहुजन आघाडी व रासप हे नवे मित्रपक्ष काँग्रेस पक्षाने जोडले.या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेस ठरला आहे. २०२९ ला अद्याप वेळ आहे, त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असेही सांगितले.

चंद्रपूर महानगरपालिकेसंदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडे ३२ चा आकडा आहे व २ सदस्यांची गरज आहे. चंद्रपुरात शिवसेना (उबाठा), वंचित बहुजन आघाडीने गट स्थापन केला आहे, त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरु असून उबाठा बरोबर चर्चा झालेली आहे व तसा प्रस्ताव दिलेला आहे. परभणी महानगरपालिकेत शिवसेना (उबाठा) ला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज आहे आणि जे होईल ते दोन्ही ठिकाणी होईल, असे स्पष्ट केले.

विमान अपघातावरील संशय दूर करा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्यूने अनेकांच्या मनात आजही संशय आहे. अपघाताला १० दिवस झाले तरी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत, त्यामुळे संशय बळावणे स्वाभाविक आहे. दृष्यमानता नसल्याने विमान अपघात झाल्याचे सांगितले जात होते पण त्यानंतर अनेक बाबी समोर येत आहेत पण  मुख्यमंत्री फडणवीस या अपघाताकडे गांभिर्याने पहात नाहीत असे दिसते, असे सपकाळ म्हणाले..

मोहोळमध्ये धाब्यावर ईव्हीएम..

जिल्हा परिषद निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे एका धाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याचे सर्वांनी पाहिले पण अशा किती मशीन मंत्र्यांच्या, सत्ताधारी नेत्यांच्या घरी आढळल्या याची माहिती घ्या. या निवडणुकीत ही अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनच्या तक्रारी आल्या आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपाचे माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा  यांनी भाजपाला संघाची आवश्यकता नाही असे म्हटले होते, त्याला भागवत यांनी प्रत्तुत्तर दिले असेल.  कोणाला, कोणाची गरज आहे हे भाजपा व रा. स्व. संघाने आपसात ठरवावे असा टोला सपकाळ यांनी लगावला.

हर्षवर्धन सपकाळ शेवटी बोलताना म्हणाले की, सीटीईटी परिक्षेवेळी परिक्षार्थींना मंगळसुत्र काढण्यास लावणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. हा प्रकार पहिल्यांदाच घडला असून एकावे तेच नवलच आहे. कॅापीचा व मंगळसुत्राचा काय संबंध आहे, असा प्रश्न उपस्थित करून भाजपा सरकार आता धर्मबुडवेपणा करायला लागले आहे, असेही सांगितले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? मुंबईला देशातील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना विलंब का ?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *