अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे असून अवैध प्रवासी वाहतूकीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाच्या बांद्रा येथील कार्यालयात मोटार परिवहन विभाग व एसटी महामंडळाची उच्चस्तरीय आढावा बैठक झाली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, अवैध वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे अत्यावश्यक आहे. एसटीकडून उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा वापर केवळ कारवाईसाठीच करण्यात यावा. त्याचा कोणताही गैरवापर सहन केला जाणार नाही. तसेच, आर.टी.ओ.च्या सर्व ५९ कार्यालयांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी एसटीने तातडीने कार्यवाही करावी. प्रत्येक संयुक्त कारवाईचा फोटो व लेखी अहवाल मुख्य कार्यालयात सादर करणे बंधनकारक असून, निष्क्रिय व जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.
प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटीने बेकायदेशीर मार्ग व वाहनांची माहिती नियमितपणे संकलित करून आर.टी.ओ. विभागास देणे, संगनमत व गैरप्रकारांविरोधात स्वतंत्र चौकशी समिती नेमणे, तसेच जीपीएस व फोटो रिपोर्टिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कारवाई अधिक पारदर्शक करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संयुक्तपणे काम करण्यावर भर देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
Marathi e-Batmya