मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’साठी कंपनीची स्थापना करणार जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’

मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यानी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र यांनी मान्यता दिली.

प्रसारभारती समवेत झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी,  महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस सांगितले की, सध्या या जागेवर एनडीझेड आणि सीआरझेडचे नियम लागू असल्याने केवळ मर्यादित क्षेत्रावर विकास शक्य आहे. संपूर्ण विकास करण्यासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या, नियमांमधील बदल आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासंदर्भात राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की,  या संयुक्त विकासासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याकरिता प्रकल्पाचा पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आणि कृती आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करून डीपीआर आणि तांत्रिक बाबींना गती देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कार्यसमिती स्थापन करावी. तसेच जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील सर्व घटक आणि विकास आराखडा अंतिम करण्याचेही निर्देश दिले.

मालाड येथील प्रसार भारतीच्या एकूण २७८ एकर जागेपैकी सुमारे १५० एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत संयुक्त विकास प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी प्रसार भारती, एमआयडीसी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. आकाशवाणीचे बहुतांश प्रसारण एफएम प्रणालीवर स्थलांतरित होत असल्याने उपलब्ध जागेचा प्रभावी वापर मीडिया व मनोरंजन क्षेत्राच्या विस्तारासाठी करण्यात येणार आहे.

या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, हॉस्पिटॅलिटी, आयटी व आयटीईएस क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प; तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्यात येणार आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, कर्जमाफी निव्वळ धुळफेक, ५० % पेक्षा जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार फडणवीस सरकारने आधी ८० लाख लाडक्या बहिणींना निकष लावून अपात्र ठरवले, आता शेतकऱ्यांचीही नियम लावून घोर फसवणूक

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना हा निव्वळ देखावा आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *