केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन तलाक कायद्यातील प्रश्नी विधानसभेत आज चर्चा झाली. या चर्चेवेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी लक्षवेधीच्या मेरिटला आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ भाजपा आमदार देवयानी फरांदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ही संभ्रमात पडल्याचे चित्र विधानसभेत पाह्यला मिळाले.
तसेच राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक शेख यांनी देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर आक्षेप घेत ही लक्षवेधी सूचना नेमकी कशासाठी आणि कोणत्या धर्मियांसाठी आणला असा सवाल करत या लक्षवेधी सूचनेच्या उद्देशाबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले. त्यामुळे या लक्षवेधी सूचनेवरून सभागृहात भाजपाचे आमदार कारण नसताना आक्रमक होत असल्याचे पाह्यला मिळाले.
तसेच देवयानी फरांदे यांनी पाकिस्तानचा उल्लेख आवर्जून करत ट्रिपल तलाक प्रकरणी तेथे स्वतंत्र यंत्रणा असल्याचे सांगितले. तर सना मलिक शेख यांनी पाकिस्तानचा उल्लेख टाळण्याची मागणी केली. त्यावर भाजपाचे अतुल भातखळकर यांनी पाकिस्तानच्या नामोल्लेखावरून संताप व्यक्त केला. त्यामुळे विधानसभेत एकप्रकारे गर्मागर्मित चर्चा सुरु असल्याचे चित्र दिसून आले.
या लक्षवेधी सूचनेला उत्तर देण्यासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम हे उत्तर देताना म्हणाले की, राज्य शासन या विषयाबाबत सकारात्मक असून समान नागरी कायदा अर्थात यूसीसीचा मसुदा, अभ्यास आणि अभिप्रायासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्यात समान नागरी कायदा अर्थात यूसीसी लागू करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.
तसेच बहुपत्नीत्वाच्या (पॉलिगामी) प्रश्नावर राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, समान नागरी कायदा अर्थात यूसीसी लागू झाल्यानंतर विवाहविषयक समान नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यावेळी बहुपत्नीत्वासंदर्भातील आवश्यक तरतुदी आणि निर्बंधांचाही विचार केला जाईल. मुस्लिम महिलांना संरक्षण आणि न्याय देण्याबाबत सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya