महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये फुले कृषी महोत्सव उत्साहात संपन्न! शेतीच्या कामात महिला भगिनी अग्रेसर ; शेतकऱ्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांच्या वाणांमुळेच! : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांचे काम चांगले आहे. राहुरी कृषी विद्यापीठाचे काम हे दीपस्तंभासारखे आहे. अजूनही आपल्याला खोलवर जाऊन काम करण्याची गरज आहे. शेतीच्या कामांमध्ये महिला भगिनी अग्रेसर आहेत. या महिलांचे शेतीमधील श्रम कमी करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. शेतकर्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसीत केलेल्या वाणांमुळेच आहे. कृषी विभागांतर्गत आपण ५० हून अधिक शेतकरीभिमुख योजना राबवत आहोत. शेतकर्यांची काळजी घेणे व त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन कृषी मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान, जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाबीज, नाबार्ड, पाणी फाऊंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषि तंत्रज्ञान घरो घरी, समृद्धी येईल गावो गावी या उपक्रमांतर्गत फुले कृषि महोत्सव-२०२६-थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे उपस्थित होते.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष तुषार पवार, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, कृषी परिषदेच्या महासंचालीका श्रीमती वर्षा लढ्ढा-उंटवाल, पुणे येथील विभागीय कृषि संहसंचालक दत्तात्रय गवसाने, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब जठार व बाळासाहेब आढाव उपस्थित होते.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सवलती कश्या देता येतील यावर आम्ही भर देत आहोत. साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या मोटरीचे बिल आपण माफ केलेले आहे. यासाठी शासनाने ३१ हजार कोटी रुपये निधी दिला आहे. कृषिच्या योजना व कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान हे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. यासाठी कृषिमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण सुरू केलेला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा आम्हाला माहित आहे. पेरणीपासून ते विपणनापर्यंत शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर मदत कशी करता येईल यावर आम्ही भर देत आहोत. कै. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काम करणारे नेते होते. शब्दाला जागणारे नेते होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही शेतकर्यांसाठी काम करत आहोत. विद्यार्थ्यांना उद्देशुन ते म्हणाले की, विद्यार्थ्यांकडून त्यांच्या घरच्यांच्या फार अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. भरपूर कष्ट करावे व आपले आयुष्य घडवावे. आयुष्य फार सुंदर आहे या सकारात्मक विचाराने आपली प्रगती होईल. कृषी पदवीधरांमध्ये फार एकी आहे. हे कृषी पदवीधर त्यांच्या मित्रांच्या सुखदुःखांमध्ये कायम सहभागी असतात. कृषी  पदवीधरांसारखी  एकी मी कोणत्याच शाखेमध्ये बघितलेली नाही. मी स्वतः सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला असून शेतीची कामे करत लहानाचा मोठा झालो. आज अनेक व्यवसाय असले तरी शेतीसारखा आनंद इतर कोणत्याही व्यवसायात नाही.

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. विलास खर्चे म्हणाले विद्यापीठाची पुढील वाटचाल शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून करणार आहोत. शेतीवर परिणाम करणाऱ्या हवामान बदलावर मात करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विद्यापीठाचा भर राहणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विद्यापीठाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे दालन सुरु करणार आहोत. फुले कृषी महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांवर आयोजीत पीक प्रात्यक्षिकांना शेतकऱ्यांनी भेटी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषिदर्शनी-२०२६ व मफुकृवि कॅलेंडर-२०२६ या प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले तसेच फुले कृषि वाहिनी ९०.८ एफ.एम. युट्युब चॅनल, मफुकृवि युट्युब चॅनल, फुले अमृतकाळ व फुले डेअरी अॅपचे लोकार्पण करण्यात आले. सौ. सविता नालकर व सौ. स्वाती शिंगाडे या प्रगतशील महिला शेतकर्यांचा त्यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक देवून आंतरराष्ट्रीय महीला शेतकरी वर्षाचे औचित्य साधून कृषि मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय समन्वीत फळ संशोधन योजनेला उत्कृष्ठ संशोधन प्रकल्पाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील व योजनेच्या प्रमुख डॉ. सुमती दिघे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचा आराखडा तयार करणारे आर्किटेक्ट रोहन मांडे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी मंत्र्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाचे विविध तंत्रज्ञान व उत्पादने दर्शविणारे स्टॉल्स, महाबीज आणि कृषि विभागाचे स्टॉल्सला मान्यवरांनी भेटी दिल्या. प्रदर्शनाच्या दरम्यान कृषि मंत्र्यांनी कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यानंतर त्यांनी भाजीपाला प्रकल्पाच्या थेट पीक प्रात्यक्षिकांना भेट दिली. उमेद अभियान अंतर्गत बचतगटांच्या स्टॉल्सला शेतकरी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजीपाला सुधार प्रकल्प, कडधान्य सुधार प्रकल्प व ज्वारी सुधार प्रकल्प येथील थेट पीक प्रात्यक्षिकांना शेतकर्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात पाच प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. प्रशांत बोडके यांनी मानले. याप्रसंगी कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, सुरसिंग पवार, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सागर गायकवाड, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे, प्रविण गोसावी, अक्षय गोसावी, नंदु वाणे, तालुका कृषि अधिकारी बापुसाहेब शिंदे, यावेळी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १० जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), प्राध्यापक, विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, कर्मचारी, विद्यार्थी व 6 हजारपेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.

About Editor

Check Also

महिला शेतकऱ्यांसाठी २३ जानेवारी रोजी मुंबईत चर्चासत्राचे आयोजन कृषी विभाग आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतक-यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *