आदित्य ठाकरे यांची टीका, ईसी म्हणजे एनटायरली कॉम्प्रमाईस अनिल परब यांचा आरोप, १९ व्या फेरीनंजर मतमोजणीची प्रक्रिया डावलली

मुंबईतील उत्तर पश्चिम मध्य लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहिर झाल्यानंतर या निकालावरून शिवसेना शिंदे गटाकडून आणि शिवसेना उबाठा गटाकडून दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर आरोप करत न्यायालयात या निकालप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, किर्तीकरांचा निकाल आल्यावर जगभरात गाजतो आहे. एलोन मस्क यावर बोलले आहेत. मी तांत्रिक बाबतीत जाणार नाही. उत्तर पश्चिम लोकसभेची जागा जिंकलेले अमोल कीर्तिकर पण इथे उपस्थित आहेत. ती सध्या देशात गाजते आहे. ४ तारखेलाच पुढे मागे सुरु होते. त्यावर चर्चा सुरु आहेत. वेगवेगळ्या माहित्या समोर येताहेत. न्यायालयाची लढाई आम्ही जिंकलो आहोत. यात गडबड झाली आहे. EC अर्थात निवडणूक आयोग म्हणजे entirely compromised आहे अशी टीकाही निवडणूक आयोगावर केली.

यावेळी अनिल परब बोलताना म्हणाले की, अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव असा निकाल आला. हा पराभवाचा निकाल संशयास्पद असून त्यावर न्यायालयात जाणारच आहोत. निवडणुकीची एक प्रक्रिया असते. परंतु कीर्तिकरांच्या मतमोजणीत या प्रक्रियेला पूर्णत हरताळ फासलेला आहे. प्रक्रिया १९ व्या फेरी नंतर विशेषकरून डावलल्या गेली. मतदानाचा एक राऊंड पूर्ण झाला की उमेदवारांना मिळालेली मते सांगितली जातात. त्यानंतर पुढच्या राऊंडची मतमोजणी केली जाते. विधानसभेला एकूण १४ टेबल्स असतात. १४ टेबल्स नंतर एक ARO चे टेबल असतं. असिस्टंट रिटर्निंग अधिकारी. सहा मतदारसंघ असतील तर ६ गुणिले १४ आणि ६ ARO. असिस्टंट रिटर्निंग अधिकारी टेबल जवळ पक्षाचा प्रतिनिधी असतो. १४ टेबल वरची मते ही असिस्टंट रिटर्निंग अधिकाऱ्याच्या टेबल वर जाते तिथे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी ती टॅली करतात आणि मग ती रिटर्निंग अधिकारीकडे जाते, असे सांगितले.

पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, यावेळी वेगळी पध्दत वापरण्यात आली असिस्टंट रिटर्निंग अधिकारी आणि पक्ष प्रतिनिधी यांच्यात अंतर ठेवण्यात आले म्हणजे ARO काय मतांची आकडेवारी RO कडे पाठवतो ते समजणार नाही. १९ व्या फेरी पर्यंत कळत होते कुणाला किती मते पडत होती. मध्ये जाळी आणि पलिकडे सगळे अशी व्यवस्था, त्यामुळे ARO कडे मतांची येणारी आकडेवारी कळत नव्हती. तिसरा विषय महत्वाचा, मतदान संपल्यानंतर १७ सी फॉर्म असतो ज्यात त्या मतपेटीत एकुण किती मतदान झाले आहे ते कळते. त्यावर सर्व मतदान प्रतिनिधींची सही असते आणि मग केद्राध्यक्ष त्यावर सही करुन आम्हाला फॉर्म देतो. मतमोजणीला जातो तेव्हा टॅली करतो की १७ सी नुसार मतपेटीत मत आहेत की नाही. मग ती मतपेटी उघडल्या जाते. दुसरा १७ सी भाग दोन अधिकारी सही करुन किती मते मोजली गेली याची टॅली करुन देतो. यावेळी अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले तर अनेकांना दिलेच नाहीत. मागणी करुन देखील हे फॉर्म दिलेलेच नाहीत असा आरोपही यावेळी केला.

अनिल परब पुढे सांगताना म्हणाले की, या मुळे त्यांची आणि आमची मते यात ६५० पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे. १९ व्या फेरी नंतर मत सांगणे बंद केले २२ व्या फेरी नंतर एकदम सगळे निकाल वाचले. शिवाय आम्ही जे फॉर्म १७ सी (२) मागतो आहे, ते पण नाकारण्यात आले आहेत. मतांमध्ये जो फरक आहे ६५० पेक्षा अधिक आहे. त्यावर आम्ही आमचा आक्षेप तिथे नोंदवला आहे. खर तर मतमोजणी प्रक्रिया संपतांना निवडणूक अधिकाऱ्यांनी कुणाचे आक्षेप आहेत का हे निकाल जाहीर करण्यागोदर विचारणे गरजेचे आहे. अशी काहीच विचारणा झाली नाही माहिती दिल्या गेली नाही आणि एकतर्फी निकाल जाहीर केला. रिटर्निंग अधिकाऱ्यांचा गोंधळ आणि त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा आम्हाला अंदाज येत होता. त्यांची धावपळ बघत होतो वारंवार बाथरुमला जात होत्या आणि तिकडे फोनवर बोलत होत्या. कोणाचे फोन आहे ह्याची माहिती आमच्याकडे येतेच आहे. उमेदवार म्हणून आम्हाला माहिती मिळणे गरजेचे आहे. दिवसभराची प्रक्रिया सीसीटीव्ही फुटेज मध्ये आली आहे. त्याची मागणी आम्ही केल्यावर आम्हाला सांगण्यात आले की दोन दिवसांनी आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज देऊ. नंतर तीन दिवसांनी देऊ डेप्युटी कलेक्टरांनी स्वत: फोन करुन आमच्या प्रतिनिधीला कळवले तुम्ही उद्या या आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज देऊ. यानंतरही त्यांनी सीसीटीव्ही फुटेज दिलेले नाही. आता कारण असे देण्यात आले की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे आम्ही सगळे सील केले आहे न्यायालयाच्या आदेशाने आम्ही सगळे देऊ. जर पारदर्शकता आहे तर सीसीटीच्ही फुटेज देण्यास काहीच अडचण नाही असेही यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, आज वायकरांच्या नातेवाईक पडलेकरांनी मोबाईल वापरला त्याबद्दलची माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे. त्यावर कुणाला फोन गेले आणि कुणाचे फोन आले याची माहिती आमच्याकडे आहे. परंतु घटना घडली ४ जूनला गुन्हा दाखल झाला १६ जूनला. दहा दिवस गुन्हा दाखल झाला नाही. आमच्या माहितीप्रमाणे हे मोबाईल बदलले गेले अशी आमची माहिती आहे. ती योग्य वेळी आम्ही जाहीर करु. काल RO ने खुलासा केला पत्रकार परिषद घेऊन की त्यानी ARO ला एक मोबाईल वापारण्यासाठी प्राधिकृत केले होते. गुरव नावाच्या माणसाचा मोबाईल होता. त्याबाबत आम्ही विचारणा केली कुणाला प्राधिकृत केले त्यावर कुठलेही आदेश, पत्र, माहिती ARO कडे नाहीत. हा नियम देशात सगळीकडे असायला हवा मग हा गुरव कोण आहे. त्यांनी काल सांगितले एन्कोअरला डेटा अपडेट करण्यासाठी एक ओटीपी येतो या ओटीपीवरुन आम्ही तो डेटा अपडेट करतो. हा फोन सुरेंद्र अरोरा आणि शहा यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर तो फोन बाहेर पाठवण्यात आला. जर हा फोन दुपारी दोन नंतर बाहेर गेला तर त्यानंतरचे राऊंड त्यांनी कुठल्या फोनने अपडेट केले? याच्यासाठी कुठला फोन वापरला कुणाला अधिकार होते? सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. या सगळ्यात गडबड आहे. तो फोन जो बाहेर गेला त्यावरून कोणाकोणाला फोन गेले. जो फोन वापरला गेला त्याची टॉवर लोकेशन देखील आमच्याकडे आहे. की तो फोन तेव्हा कुठे होता? गडबड करुन हा विजय आमच्याकडून हिरावून घेतला आहे. RO चा पूर्व इतिहास तपासून बघा त्यांच्यावर कुठले गुन्हे आहेत? कुठल्या केस मध्ये त्या सस्पेंड झालेल्या आहेत. भ्रष्टाचाराची कुठली प्रकरणे सरकारकडे आहेत हे सगळ तपासून बघितल्या जायला हव अशी मागणी करत पोलीस अधिकारी हे प्रकरण RO वर ढकलतायत RO प्रकरण पोलीसांवर ढकलतायत. सरकारने कदाचित त्यांना तसे सांगितले असेल की काळजी करु नका तुम्हाला काही होणार नाही. परंतु निवडणूक आयोगाने याचा सखोल तपास स्वत:हून करायला हवा कारण ती त्यांनी घेतलेली निवडणूक आहे अशी आमची त्यांना विनंती आहे. न्यायालयाकडे आम्ही दाद मागणार आहोत आमचा हिशोब तपासून घ्यावा. त्यानुसार आम्हाला न्याय मिळावा आणि अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित कराव. एक दोन दिवसात आम्ही याचिका दाखल करणार आहोत. ARO टेबलवरचे मते मॅच झालीच नाहीत कारण ती १९ व्या फेरीनंतर मते कळवली नाहीत. १९ ते २३/२४ फेरी दरम्यानचा हा मतांचा फरक आहे.

अनिल परब यांनी असे ही सांगितले की, सरकारी यंत्रणा दबावाखाली आहे म्हणूनच सीसीटीव्ही फुटेज मिळणे कायदेशीर हक्क असतानाही ते दिले जात नाही. लोकप्रतिनिधी कायदा कलम ५१ अंतर्गत याचिका दाखल करणार आहोत ज्यात भ्रष्ट मार्गाचा अवलंब, सरकारी यंत्रणांचा दुरूपयोग, नियमात बसतात ते सगळे मुद्दे आम्ही मांडणार आहोत. १९ व्या फेरी नंतरच गडबड झाली आहे. पोस्टल बॅलेट सुरुवातीला जाहीर करायला हवे होते ते २६ व्या राऊंडला केल्या गेले असा संशयही यावेळी व्यक्त केला.

यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या लक्षात आले असेल की फ्रॉड झालेला आहे. काही मुद्दे न्यायालयात आम्ही मांडू. ही निवडणूक मतमोजणी निष्पक्ष झाली का? प्रक्रिया कायदेशीर होती का? कदाचित देशात अनेक ठिकाणी असे झाले असेल. परंतु भाजपा मुद्दा भरकटवण्याचे उद्योग करते आहे. आम्ही हा विजय हातात घेणारच असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

माधुरी मिसाळ यांचे आश्वासन, अग्निसुरक्षा परवानगीची चौकशीत दोषी आढळल्यास विकासकावर कारवाई जोगेश्वरीतील प्रकरणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

मुंबईतील जोगेश्वरी येथील मे.ज्ञानप्रकाश शुक्ला डेव्हलपर्स एलएलपी या बांधकाम प्रकल्पाला देण्यात आलेल्या अग्निसुरक्षा परवानगीबाबत उपस्थित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *