मालवण शिवपुतळा दुर्घटनाप्रकरणी पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात कोणताही खटला चालवावा असे कारण अथवा पुरावा आम्हाला आढळून येत नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने गुरुवारी पाटील यांना जामीन मंजूर केला.
डॉ चेतन पाटील यांच्या पुतळ्याच्या बांधकाम अभियंता म्हणून नियुक्ती झाली नव्हती. डॉ चेतन पाटील यांना केवळ पुतळ्याच्या पायाशी असलेले बांधकाम स्थिर आणि मजबूत आहे की नाही त्याचा अहवाल सादर केला होता. पुतळ्याच्या पडझडीनंतरही पुतळ्याच्या पायाशी असलेला भाग शाबूत असल्याचे न्या. ए. एस. किलोर यांच्या एकल खंडपीठाने डॉ चेतन पाटील यांना जामीन देताना प्रामुख्याने नमूद केले. दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य आरोपी तथा शिवपुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्या जामीन अर्जावर येत्या २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली.
मागील सुनावणीवेळी, सिंधुदर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जयदीप आपटे आणि डॉ चेतन पाटील दोघांनीही जामिनिसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोन्ही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल झाल्याने दोन्ही आरोपींनी जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यात यावी, असे सरकारने न्यायालयाला सांगितले होते. परंतु, दोन्ही आरोपींना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या याचिकांवर येथेच सुनावणी होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा कांस्य पुतळा कोसळल्याचा दावा जयदीप आपटेने जामिनाची मागणी करताना केला. यापूर्वी, आपण नौदलासाठी कांस्य पुतळ्यांचे काम केले. परंतु, नौदलाकडून आपल्या कामाबाबत कधीच तक्रार केली नाही. याउलट, धातू शास्त्रांतील तांत्रिक कौशल्याबाबत काहीच माहीत नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी दुर्घटनेच्या नऊ तासांमध्येच तक्रार नोंदवल्याचा दावा जयदीप आपटेने याचिकेत केला. शिवाय, पुतळा कोसळल्यामुळे कोणीही जखमी झाल्याचे तक्ररीत नमूद नाही. त्यामुळे, हे प्रकरण निष्काळजीपणाचे असू शकते, असा दावाही जयदीप आपटे याने याचिकेत केला आहे. हा पुतळा अनेक शतके टिकेल आणि सुस्थितीत राहील हे लक्षात घेऊन खबरदारीचे सर्व उपाय केल्याचा दावा देखील जयदीप आपटे यांनी केला.
Marathi e-Batmya