भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला, त्यावर माफी मागण्याऐवजी भाजपा गुंडगिरी करत आहे. संसदेत भाजपाच्या खासदारांनी दादागिरी केली, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांना संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपाच्या गुंडांनी हल्ला केला, हा सत्तेचा माज असून अशा भ्याड हल्ल्याला काँग्रेस कार्यकर्ते व आंबेडकरी जनता भिक घालत नाही. सरकारने या गुंडांना तातडीने अटक करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.
वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. भाजपाच्या जे पोटात होते तेच अमित शाह यांच्या ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित, आदिवासी समाजाबद्दल भाजपाची भूमिकाच यातून पुन्हा स्पष्ट झाली आहे. अमित शाह व भाजपाने यावर माफी मागितली नाही उलट भाजपाचे लोक गुंडगिरी करत आहेत. मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना कसलीही तमा न बाळगता सरकारने तातडीने अटक केली पाहिजे. भाजपाच्या गुंडगिरीला त्याच भाषेत उत्तर देण्याची धमक काँग्रेसमध्ये आहे पण काँग्रेस अहिंसेचा मार्ग अवलंबत नाही. पण कोणी आमच्यावर हल्ला करत असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही. सरकारने तात्काळ या गुंडांवर कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या परिणामाला सरकारच जबाबदार असेल हे लक्षात ठेवा असा इशाराही दिला.
Marathi e-Batmya